हिरोशिमा दिन : हिबाकुशा सोबत अण्वस्त्र मुक्त, शांततामय आणि न्याय्य जगाची निर्मिती

 हिरोशिमा दिन : हिबाकुशा सोबत अण्वस्त्र मुक्त, शांततामय आणि न्याय्य जगाची निर्मिती

मुंबई, दि. 6 (राधिका अघोर) :जगभरातल्या मानवसमूहाला एकत्र आणणारे कोविड चे संकट आणि त्या काळात सर्व देशांनी एकमेकांना केलेली मदत पाहून आपला समाज परिपक्व होऊ लागला आहे, असं वाटू लागलं होतं. मात्र कोविडच संकट संपत नाही, तर रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली आणि जवळपास संपूर्ण जगाचे दोन तट पडले. हे युद्ध गेल्या दोन वर्षापासून सुरूच असताना, पश्चिम आशियात इस्राएल – हमास संघर्ष सुरू झाला. जगातील अनेक देश आता अण्वस्त्रधारी झाले असताना, होणारी युद्ध अत्यंत भयकारी आणि चिंताजनक आहे. अशा युद्धाचे पर्यवसान अणुयुद्धासारख्या विध्वंसक स्वरूपात होऊ नये, यासाठी हिरोशिमा आणि नागासाकी दिनानिमित्त अण्वस्त्रांच्या भयकारक परिणामाची जाणीव आजच्या पिढीला करून देणं गरजेचं आहे.

त्याच दृष्टीने, यंदाच्या हिरोशिमा दिनाची संकल्पना ‘ हिबाकुशासोबत ( हिरोशिमा नागासाकी हल्ल्यात बचावलेले लोक.) आपण सगळे अण्वस्त्र मुक्त, निर्भय आयुष्य जगण्यासाठी संकल्प करूया.
सहा ऑगस्ट 1945 रोजी, दुसऱ्या महायुद्धादरम्यान, अमेरिकेच्या हवाई दलानी सकाळी जपानच्या हिरोशिमा या शहरावर अणुबॉम्ब फेकला. जगाच्या इतिहासातला हा पहिला अण्वस्त्र हल्ला होता. दुसरे महायुद्ध अंतिम टप्प्यात पोहोचले होते. मात्र जपान निकराने लढा देत होते. अशावेळी अमेरिकेचे अध्यक्ष हेनरी ट्रूमन यांनी ऑपरेशन मॅनहॅटन अंतर्गत, जपानवर अणुबॉम्ब फेकण्याची योजना आखली. जपानवर दहशत निर्माण करणे आणि युद्ध संपवण्यास भाग पाडणे, ह्या हेतूने, हा हल्ला करण्याची योजना आखल्याचा अमेरिकेचा दावा होता. ‘लिटल मॅन’असं ह्या बॉम्बचं नाव ठेवलं गेलं होतं.

हिरोशिमा शहरावर पडलेल्या ह्या भयंकर अणुबॉम्बमध्ये एका क्षणात संपूर्ण शहराची स्मशानभूमी झाली. काही मिनिटांतच जवळपास एक लाख माणसे मारली गेली, कित्येक अपंग झाली, अनेकांचा काही दिवसांनी मृत्यू झाला. संपूर्ण शहर काळे ठिक्कर पडले होते. ह्या भयंकर हल्ल्याचा परिणाम इतका भयानक होता, की बॉम्ब फुटताच जवळपास 4000 अंश सेल्सिअस इतकी उष्णता निर्माण झाली. आसपासच्या 30 किलोमीटर परिसरात कित्येक तास काळा प्रदूषित पाऊस पडला, त्या पावसाच्या संपर्काने आणखी लोकांचा मृत्यू झाला, सजीव सृष्टी नष्ट झाली, लोक कायमचे जायबंदी झाले. आजही हा दिवस जगाच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून पाळला जातो.

जगाला आणि हा बॉम्ब निर्माण करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही पहिल्यांदाच अणुबॉम्बची भीषण ताकद कळली. हा बॉम्ब फुटेपर्यंत, त्याचे जनक, ओपनहायमर यांनाही असे वाटत होते की, जोपर्यंत जपानवर असा हल्ला होणार नाही, तोपर्यंत त्यांना भीती वाटणार नाही, आणि त्यांचे हल्ले थांबणार नाही. मात्र हिरोशिमा शहरावर पडलेल्या ह्या हल्ल्यात, लाखो निरपराध, निष्पाप माणसे मारली गेली. हा असा संहार आणि विध्वंस पाहून मात्र ओपन हायमर यांना या निर्णयाचा पश्चाताप झाला. या संहारापाठोपाठ तीनच दिवसांनी म्हणजे नऊ ऑगस्टला अमेरिकेने जपानच्या नागासाकी ह्या दुसऱ्या शहरावर अणुबॉम्ब फेकला. आणि ते ही शहर बेचिराख केले. ह्या दोन हल्ल्यात, सुमारे दीड लाख लोक मारले गेले, कित्येकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली.

जपान ह्या दोन हल्ल्यामुळे पूर्ण कोलमडून गेला, आणि तिथल्या राजाने सपशेल शरणागती पत्करली. ह्या घटनेनंतर ओपन हायमर स्वतः अण्वस्त्र वापराचे कडवे विरोधक झाले. ह्या घटनेत मरणारी माणसे सैनिक नव्हते, तर युद्धात नसलेले निरपराध नागरिक होते. त्यामुळे संपूर्ण जगाने अमेरिकेच्या ह्या अमानुष हल्ल्यावर टीका केली. ह्या हल्ल्यानंतर दुसरे महायुद्ध तर थांबले, मात्र जपान पूर्णतः उद्ध्वस्त झाला. घायाळ आणि अपमानित झालेला जपान ह्या दोन हल्ल्यानंतर एकवटला आणि फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून ह्या देशाने उंच भरारी घेतली. ह्या हल्ल्यानंतर हिरोशिमा शहरात फुललेले पहिले फूल ओलियंडर ह्या देशाचे राष्ट्रीय फूल ठरले.
ह्या अणूहल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. यानंतरच अण्वस्त्र बंदीसाठीची मानसिकता तयार झाली. तसे करार करण्याची गरज निर्माण झाली. आजही जपानमध्ये हिरोशिमा दिनाच्या दिवशी हजारो लोक ह्या नागरिकांसाठी एकत्र येतात आणि प्रार्थना करतात. या भीषण हल्ल्यानंतर, जपानसह अनेक देशांनी अण्वस्त्र बंदीची भूमिका मांडली. त्यानंतर आजही सगळे देश पुन्हा कुठेही, अणूयुद्धाची परिस्थिती येणार नाही यासाठी प्रयत्न करत असतात.

ML/ML/PGB 6 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *