अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

मुंबई दि.7(एम एमसी न्यूज नेटवर्क): बदलापूर अक्षय शिंदे बनावट चकमक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. या प्रकरणात संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे, राज्य सरकारने यापूर्वी या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, न्यायालयाने यावर कडक भूमिका घेत आदेश बजावले होते.
या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची परवानगी मागितली असता, ती देखील उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारसमोरील पर्याय मर्यादित झाले असून, संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या प्रकरणामुळे पोलिस यंत्रणेतील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, कायद्याच्या राज्याची हमी देणाऱ्या यंत्रणांकडून तत्काळ कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.