धारावीमधील आपदाग्रस्तांना राज्य शासनाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी..

मुंबई,दि.२९ – शनिवारी पहाटे दीड पासून ते शनिवारी दुपारी दोन पर्यंत मुंबईत संतधार पाऊस झाला. आकस्मिकपणे आलेला पाऊस आणि त्यात नाले सफाईची कामे अपूर्ण राहिल्याने धारावीमधील असंख्य झोपड्या,घरांमध्ये गुडघाभरापेक्षा अधिक पाणी साचून असंख्य धारावीवासियांचा संसार उघड्यावर आलेला आहे. राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाने या आपदग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त धारावीवासियांना तातडीने रोख आर्थिक सहाय्य करावे अशी जोरदार मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार बाबुराव माने यांनी राज्यशासन,मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.
मुंबई मनपाच्या निवडणुका दोन वर्षे झालेल्या नाहीत. यामुळे सध्या नगरसेवकच महापालिकेत नाहीत. नगरसेवक नसल्याने स्थानिक पातळीवरील नालेसफाई,गल्ल्या, गल्ल्यातील इतर सफाईची कामे रखडलेली आहेत. या रखडलेल्या कामांमुळे संततधार पावसाने झोपड्या, घरांमध्ये गुडघाभरापेक्षा अधिक पाणी शनिवारी,रविवारी साचले. यामुळे कपडा लक्ता, इतर संसारोपयोगी साहित्य, मुलांची शाळेची दप्तरे, वह्या पुस्तके यांचे नुकसान मोठे झालेले आहे.शिवाय या पावसामुळे धारावीत झोपड्या, झोपड्यात गृह उद्योग करणाऱ्यांचे ही मोठे नुकसान झालेले आहे.हे झोपडपट्टीवासीय व छोट्या गृह व्यावसायिकांना शासनाने तातडीने अर्थसहाय्य,अन्नधान्य, मुलांना वह्या पुस्तकांचे वाटप अग्रक्रमाने करण्याची गरज असल्याचे बाबुराव माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
धारावी मधील इंदिरानगर, शिवशक्तीनगर, शास्त्रीनगर, काळा किल्ला, खांबदेवनगर, संग्रामनगर संगमनगर आदी भागात असलेल्या झोपड्या, घरांमध्ये शनिवारची पहाट सकाळपासूनच पाणी भरण्यास सुरुवात झाली. पावसाचा हा जोर शनिवारी दुपारी दोन पर्यंत होता. यामुळे बहुसंख्य धारावीवासियांना रविवारची सुट्टी शनिवारीच घ्यावी लागली. पण ही सुट्टी न ठरता घरातील पाणी बाहेर काढण्याचा त्यांचा हा दिवस ठरला. घरातील संसार उघड्यावर आल्याने अनेक झोपडपट्टीवासियांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सलग १२\१३ तास संततधार अतिवृष्टी झाल्याने धारावीवासियांचे हाल झाले.याकडे बाबुराव माने यांनी राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
नाल्यांची कामे अर्धवट धारावीतील प्रेमनगरचा मिठी नदीचा नाला, जोगळेकर नाला, खांबदेव, शास्त्रीनगरमधील नाल्यांच्या साफसफाईची कामे ही अर्धवट राहिली आहेत. सध्या मुंबई मनपात प्रशासन राज आहे. यामुळे धारावीतील नालेसफाईची कामे ही अपूर्ण राहिली अशी टीका बाबुराव माने यांनी केली.
धारावी मधील नाल्यांच्या साफसफाईची कामे मे महिन्यापूर्वीच न केल्याने अचानक आलेल्या पावसाने धारावीतील वस्त्या वस्त्यात पाणी भरले. या पावसाने धारावी झोपडपट्टीला तळ्याचे स्वरूप आले. याकडेही बाबुराव माने यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
जोगळेकर नाल्यावरील अतिक्रमणे हटवा
जोगळेकर नाल्यावर मोठे अतिक्रमण झालेले आहे.या अतिक्रमणामुळे वरील भागातून येणारे पाणी या नाल्यात तुंबून ते आजूबाजूच्या झोपड्या, घरे जवळच्या रस्त्यावर येते. मनपाचे स्थानिक प्रभाग कार्यालय, वॉर्ड ऑफिसने हे नाल्यावरील अतिक्रमण योग्य वेळी दूर करून पाणी तुंबण्याची समस्या भविष्यात निर्माण होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे असेही बाबुराव माने यांनी आपल्या या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलेले आहे.
धारावीतील गृह उद्योगाचे मोठे नुकसान
धारावीनगरीत असंख्य छोटे व्यावसायिक असून या गृह उद्योजकांना या अवचित आलेल्या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे.गारमेंट उद्योगासह मसाले,फरसाण निर्माते,प्लॅस्टिकपासून खेळणी बनवणारे याच बरोबर पीओपी करणारे असे असंख्य उद्योजकांचा कणाच या पावसाने मोडला आहे.या गृह उद्योजकांच्या कारखान्यात पाणी शिरुन यंत्रे बंद पडली आहेत.कच्चा माल भिजून त्यांचे नुकसान झाले आहे.नवीन कापड भिजल्याने गारमेंटवाले संकटात सापडले आहेत.हीच स्थिती चर्मोद्योगाचीही आहे.त्यांनी बनवलेल्या चमड्याच्या वस्तू भिजल्या आहेत.त्यांच्या यंत्र सामुग्रीत पाणी गेल्याने त्यांचे
पुढे व्यवसाय करण्याचे वांदे झालेले आहेत.या सर्व व्यावसायिकांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांना भरीव अर्थ सहाय्य राज्य सरकारने करावे अशी मागणीही बाबुराव माने यांनी केली आहे.