मुंबईसह कोकणसह 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार, ३ दिवस जपून राहण्याचा IMD चा सल्ला

पुढील काही दिवसांत तापमानात मोठी वाढ होणार असून राज्यभरातील नागरिकांना उष्णतेच्या झळा जाणवणार आहेत. मुंबई कोकणसह ५ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या चार दिवसात तापमान 36-38 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. कोकणातही येत्या 3 दिवसांत 2-3 अंशांनी कमाल तापमानात वाढ होणार आहे. तर, विदर्भात येत्या तीन दिवसांत तापमान चढेच राहणार असून त्यानंतर तापमान 2-4 अंश सेल्सियसने वाढणार आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागाने राज्यात मुंबई, पालघरसह कोकण पट्ट्यात तीव्र हवामानाचे इशारे दिले आहेत. पाच जिल्ह्यांना उष्ण आणि आर्द्र हवामानाचे यलो अलर्ट देण्यात आले असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये तीव्र तापमान बदलामुळे नागरिकांना उष्णतेच्या चटक्यासह आर्द्र हवामानामुळे उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे.