शासनाचे दुर्लक्ष की व्यवस्थेचा बळी? ग्रंथच्या पालकांची मृत्यू दाखल्यासाठीची धडपड

 शासनाचे दुर्लक्ष की व्यवस्थेचा बळी? ग्रंथच्या पालकांची मृत्यू दाखल्यासाठीची धडपड

भाईंदर, दि 5

एका निष्पाप जीवाचा अपघाती मृत्यू आणि त्यानंतरचा पालकांचा त्रासदायक अनुभव – ही कहाणी आहे ग्रंथ मूथा या ९ वर्षीय चिमुकल्याची, ज्याचा मृत्यू महापालिकेच्या गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुलातील तरण तलावात बुडून झाला. मात्र या दु:खद घटनेनंतरही पालकांना मृत्यू दाखल्यासाठी प्रशासनाच्या दरवाज्याशी केलेली परतपरतची याचना थांबण्याचे नाव घेत नाही.

या घटनेला अनेक दिवस लोटले तरीही ग्रंथच्या मृत्यूचा अधिकृत दाखला पालकांना मिळालेला नाही. महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये ‘हे काम इथे नाही, तिकडे जा’ असे सांगून त्यांची फिरवाफिरव सुरू आहे. कधी मुख्य कार्यालय, तर कधी प्रभाग कार्यालय – अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी धावपळ करूनही पालकांच्या हाती काहीच लागत नाही.

ग्रंथची आई आणि आजोबा मागील अनेक दिवसांपासून दाखल्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र नवनवीन प्रक्रियांची आणि नियमांची माहिती दिली जात नसल्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. १० वाजता बोलावून ठेवलेल्या वेळेनंतर तासन् तास वाट पाहूनही त्यांचं काम पूर्ण होत नाही. त्यामुळे आधीच शोकाकुल असलेल्या कुटुंबावर दुहेरी मानसिक ताण निर्माण झाला आहे.

एकीकडे पालिका प्रशासनाकडून अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली असून, अहवाल सादर होऊनही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. दुसरीकडे दाखल्यासारख्या मूलभूत कागदपत्रासाठीही पालकांना हेळसांड करावी लागत आहे.

सामान्य नागरिकांना अशा प्रसंगी प्रशासनाकडून मदतीची आणि सहवेदनांची अपेक्षा असते. पण या प्रकरणात मात्र उलट चित्र दिसून येत आहे. मृत्यू दाखला मिळण्यास विलंब होणं ही केवळ व्यवस्थेची गलथानपणा नसून, शासकीय यंत्रणेच्या असंवेदनशीलतेचंही उदाहरण ठरत आहे.

नागरिकांचा रोष वाढत चालला आहे आणि प्रशासनाने तत्काळ याची दखल घ्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *