एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचं दिमाखदार उद्घाटन

 एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचं दिमाखदार उद्घाटन

कोल्हापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :भवतालातील स्पंदनं साहित्यिकानं टिपलीच पाहिजेत.कस्पटदेखील साहित्यिकाला वर्ज्य असता कामा नये. लेखकाच्या दृष्टीनं मुंगीसुद्धा महत्वाची असली पाहिजे. त्यातूनच साहित्य अधिक वास्तववादी होईल, असा आशावाद यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर
तालुक्यातील वाशी इथं आज एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाचं यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत यांच्या हस्ते आणि संमेलनाध्यक्ष डॉ. राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते.

मराठी राजभाषा पंधरवड्यानिमित्त गुंफण अकादमी आणि वाशी इथल्या राजवीर पब्लिक स्कूलच्या दशकपूर्ती निमित्त दोन दिवसीय गुंफण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाला महाराष्ट्र, गोवा तसंच कर्नाटक सीमा भागातील साहित्यिक आणि रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

गुंफण सदभावना साहित्य संमेलनाचं हे एकोणिसावं वर्ष असून आजवर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्याच्या विविध भागामध्ये साहित्य संमेलनं यशस्वीपणे भरविली असल्याचं गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी सांगितलं. या भागात हे पहिलंच साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात लोकजागर, पुस्तक प्रकाशन,
पुरस्कार वितरण, प्रकट मुलाखत, कवी संमेलन, कथाकथन असे अनेकविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे आणि स्वागताध्यक्ष बी. ए. पाटील यांनी संमेलनाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. आज सकाळी वाशी इथल्या बिरदेव मंदिरापासून लेझीम हलगीच्या ठेक्यावर आणि टाळमृदंगाच्या तालावर निघालेल्या भव्य ग्रंथदिंडीनं गुंफण साहित्य संमेलनाला सुरुवात झाली.
संमेलनाच्या पूर्वसंध्येला लोकजागर कार्यक्रमात लोककलाकारांचा अभूतपूर्व असा आविष्कार पाहायला मिळाला. Grand opening of the Nineteenth Ghumfan Sadbhavana Sahitya Samela

ML/KA/PGB
28 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *