राज्यपालांनी आम्हाला महाराष्ट्र शिकवू नये
मुंबई,दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ‘महाराष्ट्र काय हे आम्हाला राज्यपाल कोश्यारींनी शिकवू नये. मी पदाचा मान राखतोय. अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही,’ असा तिखट विधान करत राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टिका केली. मुंबईतील नेस्को सेंटर येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यासह देशातील राजकीय नेत्यांवर प्रखर टिका करत खऱपूस समाचार घेतला. तसेच मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत भोंगे न हटवल्यास हनुमान चालिसा लावण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना राज म्हणाले – दोन प्रकल्प गुजरातमध्ये गेले याचे वाईट वाटत नाही, पण ते केवळ गुजरातमध्ये जात आहे याचे वाईट वाटतंय, पण बाकीच्या कोणत्याही राज्यात प्रकल्प जात नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरात गुजरात करताय सर्व राज्यांना समान न्याय देत नाही असा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज म्हणाले, “काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले… मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी करत नाही.”
सावरकरांच्या मुद्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.
मनसेने हाती घेतलेली आंदोलनं विस्मरणात जाण्यासाठी काय करता येईल त्यासाठी एक यंत्रणा राबवली जाते. याच कारणामुळे आम्ही मनसेने राबवलेल्या आंदोलनांची एक पुस्तिका काढणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली. ही पुस्तिका लवकरच मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना देण्यात येईल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेत मनसेची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त करत लोकांशी थेट संपर्क साधणारा प्रत्येक गट अध्यक्ष माझ्यासाठी राज ठाकरे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले
SL/KA/SL
27 Nov. 2022