गीता धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करणारा दिव्यग्रंथ – राज्यपाल आचार्य देवव्रत
पुणे, दि १: वेदश्री तपोवन, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, व इत्यादी संस्थांच्या सहयोगाने वेदश्री तपोवन, आळंदी येथे आयोजित गीता जयंती महोत्सवाचा तीन दिवसाचा कार्यक्रम माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितित संपन्न झाला. या प्रसंगी पुण्याचे प्रसिद्ध उद्योगपती,महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी व महोत्सवाचे प्रायोजक श्री अभय भुतडा, श्री राम जन्मभूमी न्यास, अयोध्या येथील कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष मुकुंद दातार व संजय मालपाणी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
अंतिम दिनी महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ह.भ.प. शांतीब्रह्म श्री मारुती बाबा कुरहेकर यांना संत श्री ज्ञानेश्वर पुरस्कार व सी.एस. रंगराजन यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान केला.
कार्यक्रमाच्या आरंभी श्री अभय भुतडा यांनी माननीय राज्यपालांचे गणेश मूर्ति देऊन स्वागत केले.
या प्रसंगी बोलताना माननीय राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले, “दोन्ही पुरस्कार विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. गीता नेहमीच आपल्याला धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करते व विपरित परिस्थितीत धीर देते. गीता ही वेदांचे सार आहे आणि आळंदीतिल महान संत ज्ञानेश्वर यांनी गीता मराठित अनुवादित करून सामान्य लोकांपर्यंत पोचविली. गीता जीवन कसे जगायचे हे आपल्याला नेहमी सांगते आणि मार्गदर्शन करते. जगज्जेता अलेक्जेंडरच्या गुरुने देखील त्याला भारतातून गीता ग्रंथ आणायला सांगीतला होता आशी महान आपली भगवद्गीता आहे. गीता जयंती महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आणि मला आमंत्रित केल्याबद्दल स्वामी गोविंद देव गिरी महाराज व महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानचा मी आभारी आहे. वेद शिक्षण व ज्ञानदानाचे विविध उपक्रम महर्षि वेदव्यास प्रतिष्ठानने राबविले आहेत जे प्रशंसनीय आहेत.”
स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, “या कार्यक्रमाला हजर राहिल्याबद्दल राज्यपालांचा आभारी आहे. गीता हा एक दीपस्तंभ आहे जो आपल्या जीवनातील अंधार दूर करते व मार्गदर्शन करते . संत ज्ञानेश्वर महाराज यांचे आळंदी हे निवासस्थान व त्यांनी गीता सर्व जनसामान्यांपर्यंत मराठी भाषेतून पहिल्यांदा पोहोचवली, या पवित्र स्थानी गीता जयंती महोत्सव होणे ही सार्थ घटना आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला भगवंत श्री कृष्णाने गीतेचे ज्ञान दिले त्या दिनाचे औचित्य साधून आपण सर्व मिळून गीता जयंती महोत्सवाचे आयोजन केले त्याबद्दल सर्वांना गीता जयंतीच्या शुभेच्छा.”
तीन दिवसाच्या महोत्सवात लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, कांची कामकोटी जगद्गुरू शंकराचार्य अनंतश्री विजयेन्द्र सरस्वती स्वामी महाराज, राजस्थान पत्रिका, जयपूरचे मुख्य संपादक गुलाब कोठारी (ज्यांना महार्षी वेद व्यास पुरस्कार प्रदान करण्यात आला), डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, इत्यादी प्रमुख वक्त्यांनी आपले विचार मांडून महोत्सवाला गौरविले.
महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे ट्रस्टी व महोत्सवाचे प्रायोजक श्री अभय भुतडा यांनी आभार प्रदर्शन केले व सर्वांच्या सहकार्य व समर्पणामुळे महोत्सव यशस्वी झाल्याचे सांगितले.KK/ML/MS