ऑनर किलिंग रोखण्यासाठी आता सरकारी सुरक्षागृहे

नाशिक, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ऑनर किलिंगसारख्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी सरकार आता पोलिस बंदोबस्त असलेले सुरक्षागृह उभारणार असून जोडप्यांना तिथे निवासासोबत सुरक्षा पुरवली जाणार आहे. गृह विभागाच्या या निर्णयाचे जातपंचायत मूठमाती अभियानाने स्वागत केले आहे.
देशात अनेक ठिकाणी ऑनर किलिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भारतीय राज्यघटनेने व्यक्तीला दिलेल्या जीवितेच्या, स्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या मूलभूत अधिकारावरच हा घाला असल्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी शक्तीवाहिनीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात यापुढे आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरविण्याच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यात पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यात जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांचा सदस्य म्हणून तर कारवाईचा तसेच न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक आढावा घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षेखाली समिती असणार आहे, त्यामुळे ऑनर किलिंगच्या घटनांना पायबंद बसण्याची शक्यता आहे.
हरियाणातील खाप पंचायतीचा अभ्यास करण्यासाठी आम्ही हरियाणात गेलो होतो. ऑनर किलिंगवर उपाययोजना म्हणून तिथे सुरक्षागृह बांधण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात असे सुरक्षागृह उभारण्यात यावेत, अशी मागणी जातपंचायत मूठमाती अभियानाने वेळोवेळी राज्य सरकारकडे केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशी उपाययोजना होत असल्याने ऑनर किलिंगच्या घटना रोखता येतील असे त्यांचे म्हणणे आहे. Government security houses now to prevent honor killings
ML/KA/PGB
28 Dec 2023