कामकाजाची ऐशी तैशी , लक्षवेधी भवन आणि सरकारची झाली नामुष्की

 कामकाजाची ऐशी तैशी , लक्षवेधी भवन आणि सरकारची झाली नामुष्की

मुंबई. दि. २१ (मिलिंद लिमये) : विधानसभेच्या कामकाजाच्या प्रथा आणि परंपरा धाब्यावर बसवून बेधडकपणे सभागृहाचे कामकाज मनमानी पद्धतीने रेटण्याचा प्रयत्न आहे , कामकाजाची ऐशीतैशी केली जात आहे असा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केल्यावर सत्तारूढ पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने तर विधिमंडळाचे नाव बदलून लक्षवेधी भवन ठेवा अशी उपरोधिक टीका केली. त्यातच आज एका विधेयकाच्या वेळी सभागृहात कोरमच नसल्यानं कामकाज स्थगित ठेवण्याची नामुष्की ओढवली.

सभागृहात तीस, पस्तीस लक्षवेधी सूचना चर्चेला येतात त्यामुळे इतर मुख्य कामकाज बाजूला पडते, नियम २९३ च्या चर्चाच होत नाहीत अशी टीका आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी केली आणि सभागृहाच्या कामकाजाची ऐशीतैशी करून टाकल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तर अशासकीय कामकाज होत नाही लक्षवेधी सूचनेवरच सगळा भर आहे, अशासकीय कामकाज होतच नाही त्यामुळे विधानभवन हे नाव बदलून लक्षवेधी भवन असे ठेवा असा उपरोधिक सल्ला भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

सायंकाळी माथाडी कामगार सुधारणा विधेयक मंजूर करायच्या वेळी सभागृहात आवश्यक गणसंख्या नसल्याने कामकाज स्थगित ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. सत्तारूढ बाजूने सदस्यांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे सदस्य हजर राहण्यासाठी सातत्याने बेल वाजवण्यात येऊन ही गणसंख्या पूर्ण झाली नाही.

शेवटी ज्येष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. कामकाज बरेच बाकी आहे मात्र आठवड्याचा शेवटचा दिवस असल्यानं बरेच सदस्य त्यांच्या मतदारसंघात निघून गेले आहेत असं मंत्री म्हणाले.
अशीच विनंती यातून मार्ग काढण्यासाठी सहकार्याची अपेक्षा मंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

विरोधी पक्षांचा अधिकार हा चर्चेचा विषय ठरला आहे, आपण समानतेची भाषा करत आहात हे फारच चांगलं आहे . विरोधकांची संख्या कमी असल्यानं त्यांना चेपण्याचं काम करता , विरोधी सदस्यांना वेळ देत नाही, याचा राग आम्ही काढणार नाही असे चिमटे जितेंद्र आव्हाड यांनी काढले. आम्ही विरोधकांना सोबत घेऊन त्यांना मोठी पदे देतो असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. आमच्या संख्येच्या आधारे आम्हाला किंमत दिली जात नाही, विरोधी पक्षनेता नेमला जात नाही, नियमानने कामकाज चालत नाही अशी टीका यावेळी नाना पटोले यांनी केली. अखेर विरोधकांनी सहकार्याची भूमिका घेऊन सभागृह सुरू ठेवण्यास मंजुरी दिली, दरम्यान गणसंख्या ही पूर्ण झाली, यानंतर विधेयक मंजूर झालं.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *