लातूर, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दोन तीन वर्षा पूर्वी शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावामुळे लातूर जिल्ह्यातील काही भागातील शेतकरी त्रस्त झाले होते. प्रभावी उपाययोजना केल्यामुळे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव त्यावेळी कमी झाला होता. या शंखी गोगलगायीच्या संकटातून बचावल्यानंतर आता शेतकऱ्यांसमोर अशाच प्रकारचे एक नवीन संकट उभे राहण्याची शक्यता आहे.
लातूर तालुक्यातील बाभळगाव येथील एका शेतकऱ्याच्या शेतात गेल्या खरीप हंगामापासून आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव झाला असून, यामुळे त्यांच्या शेतातील पिकांचे आणि रोपवाटिकेतील रोपांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकरी महादेव गोमारे यांनी दिली. खरीप हंगामापासून या आफ्रिकन गोगलगायींचा प्रादुर्भाव शेतात झाला असून, सध्याही या आफ्रिकन गोगलगायीचा प्रादुर्भाव दिसत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. आफ्रिकन गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्यामुळे काही प्रमाणात प्रादुर्भाव त्यांना रोखता आला असला तरी अद्याप या आफ्रिकन गोगलगायींचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे ते चिंतेत आहेत.
रब्बी पिकांवर याचा सध्या फारसा परिणाम जाणवत नसला तरी येणाऱ्या खरीप हंगामात याचा प्रादुर्भाव वाढवण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आफ्रिकन गोगलगायींची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता येणाऱ्या खरीप हंगामात मोठे संकट उभे राहण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन या आफ्रिकन गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ML/ML/PGB
29 Dec 2024