गोवा मुक्ती संग्राम: स्वतंत्र भारतात लढला गेलेला तेजस्वी स्वातंत्र्यलढा

मुंबई, दि. 22 (राधिका अघोर) : हे वर्ष आपण संविधान स्वीकारल्याचे वर्ष म्हणून साजरे करत आहोत. मात्र स्वतंत्र भारतात असे एक राज्य होते, जे पारतंत्र्यात होते. आणि या राज्याला स्वतंत्र करण्यासाठी एक नवा स्वातंत्र्यलढा द्यावा लागला. ते राज्य म्हणजे महाराष्ट्राला लागून असलेले सुंदर निसर्गसंपन्न राज्य गोवा!
देशाच्या स्वातंत्र्यानंतर 14 वर्षं गोव्याचा स्वातंत्र्यलढा सुरू होता. भारतावर इंग्रजांनी दीडशे वर्षं राज्य केलं पण पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षांहून अधिक काळ राज्य केलं. खरे तर, भारत स्वतंत्र झाला त्यानंतर इतर सगळ्या संस्थानांचं विलिनीकरण झालं, त्याच वेळेस गोवा आणि दीव दमण पण पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त व्हायला हवा होता. पोर्तुगीजांनी तर शिवाजी महाराजांच्या काळापासूनच गोव्यात आणि आजूबाजूच्या परिसरात, ख्रिस्ती धर्मपरिवर्तनाची मोहीमच सुरू केली. आणि त्याला विरोध करणाऱ्यांवर अनन्वित अत्याचार केले होते.
पद्धतशीरपणे हिंदू विरोधी हिंसाचार, जबरदस्तीने केलेले हिंदूंचे धर्मांतर , हिंदू हत्याकांड , हिंदू मूर्ती भंजन, हिंदू मंदिरांचा विध्वंस आणि हिंदू मुद्रा विटंबना, तसेच हिंदू शैक्षणिक केंद्रांचा विनाश या पोर्तुगीजांच्या अत्याचारांना गोव्याचे हिंदू कंटाळले होते. त्यामुळे सशस्त्र आणि सविनय अशा दोन्ही मार्गानं गोवन जनतेने स्वातंत्र्यासाठी आंदोलने सुरू केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर तर पोर्तुगालचा शासक सालाझार अधिक कठोर झाला. त्यानं इथं अत्याचारांच परिसीमा गाठली. पोर्तुगीजांविरोधात उठाव होऊ नये म्हणून कडक निर्बंध टाकले. लिहिणे, बोलणे यावरही निर्बंध लावले गेले.
याकाळात ‘आझाद गोमंतक दल’सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. पोर्तुगीजांच्या विरोधात गनिमी पद्धतीने अनेक हल्ले या सशस्त्र दलाने केले. आपल्याला भारत सरकार, आपलं सरकार मदत करेल, अशी त्यांची अपेक्षा होती, पण दुर्दैवाने असं झालं नाही. कारण स्वतंत्र भारताच्या पहिल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील तत्कालीन मंत्री आणि खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे गोव्यातील पोर्तुगीजांच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास अनुकूल नव्हते.
पोर्तुगालच्या विरोधात सत्याग्रहींनी केलेल्या कुठल्याच कृत्यांना भारत सरकारकडून परवानगी किंवा पाठिंबा मिळणार नाही हे भारत सरकारने आधीच स्पष्ट केले होते. ‘एवढंच नव्हे, तर नेहरूंनी गोवा मुक्तीसाठी चालवलेल्या सशस्त्र लढा आणि सत्याग्रहाला कोणतंच सहकार्य केले नाही’ जर भारत सरकारने आणि पंडित नेहरूंनी त्यावेळी ठाम भूमिका घेतली असती तर गोवा देखील भारतापाठोपाठ मुक्त झाला असता. समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली 1946 पासून गोवा मुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी पडली.
पोर्तुगीजांविरुद्ध संघर्ष करत गोवा स्वतंत्र करण्यासाठी गोमांतकीय जनता रस्त्यावर उतरली. विशेष म्हणजे, या लढ्यात महाराष्ट्राच्या नेत्यांनी आणि जनतेनं गोव्याला पूर्ण साथ दिली. महाराष्ट्रातल्या उजव्या-डाव्या, समाजवादी अशा विविध विचारधारांच्या लोकांनी एकत्र लढा देत गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, पं. महादेवशास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधू दंडवते, जयंतराव टिळक, संगीतकार सुधीर फडके असे सगळे लोक गोवा मुक्ती संग्रामात हिरीरीने सहभागी झाले होते. यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता, त्यांनी तुकड्यांचं नेतृत्व केलं, प्रसंगी हातात शस्त्र घेऊन लढल्या देखील.
सुधा जोशी, सिंधुताई देशपांडे, कॉ. मालिनीबाई तुळपुळे, कमलाबाई भागवत, कमला उपासनी, प्रभा साठे, शांत राव या महिला लढ्यात अग्रभागी होत्या. नियोजनबद्धरितीने आंदोलन सुरु राहिले. गोव्याच्या सर्व सीमा या स्वातंत्र्य सैनिकांनी व्यापून टाकल्या होत्या.
अखेरीस 18 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ राबवत गोवा मुक्त केला. गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या.पत्रादेवी येथे स्वातंत्र्य सैनिकांवर पोर्तुगीज सैन्याने मोठा गोळीबार केला. त्यात अनेक स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. अखेरीस 19 डिसेंबर 1961 च्या रात्री गोवा स्वतंत्र झाला. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगीजांचे हिंदुस्थानातील सुमारे ४५० वर्षांचे राज्य समाप्त झाले.
या दिवसाची आठवण म्हणून आज म्हणजेच दर 19 डिसेंबर ल गोवा मुक्ती दिन साजरा केला जातो. गोव्यात या निमीत्त लष्करी, नौदल आणि शासकीय स्तरावर विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.
RA/ML/PGB 19 Dec 2024