गिरीश भाऊंची जादू , धनगर आरक्षण उपोषण मागे

अहमदनगर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी मंत्री गिरीश महाजन यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे उपोषणकर्ते अण्णासाहेब रुपनर आणि सुरेश बंडगर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर अण्णासाहेब रुपनर व सुरेश बंडगर यांनी उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. याआधी मराठा आरक्षणावर उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे यांचीही महाजन यांनी भेट घेतली होती.
ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते लिंबूपाणी घेऊन रूपनर आणि बंडगर यांनी उपोषण सोडले. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शासन कटीबद्ध आणि सकारात्मक आहे असे महाजन यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार प्रा. राम शिंदे, माजी आमदार अण्णासाहेब डांगे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब दोडतले आदी उपस्थित होते.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नासंदर्भात 21 सप्टेंबर रोजी यशवंत सेनेच्या प्रतिनिधी समवेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे विस्तृत बैठक झाली. धनगर समाजाची आरक्षणाची मागणी न्याय असून शासनाने एकमताने या मागणीला पाठिंबा दिला. आरक्षणाबाबत काही तांत्रिक अडचणी असून काही बाबी न्याय प्रविष्ठ आहेत. त्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देत तांत्रिक अडचणींची पन्नास दिवसांमध्ये सोडवणूक करण्यासाठी शासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आंदोलनादरम्यान समाज बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येतील. तसेच आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येईल. धनगर समाजासाठी असलेल्या विविध योजना, सोयी-सवलतींची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचेही मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विनंतीला मान देत गेल्या 20 दिवसापासुन सुरू असलेले उपोषण सोडले आहे. धनगर समाजाला शाश्वत आरक्षण देण्यासाठी शासन अत्यंत सकारात्मक असून सर्व समाज बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ML/KA/SL
26 Sept. 2023