गणपतीसाठी चाकरमान्यांचा…एसटीला उदंड प्रतिसाद..!

 गणपतीसाठी चाकरमान्यांचा…एसटीला उदंड प्रतिसाद..!

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेले आहेत.

मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा ०२ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी तसेच एसटी यांचे एक अतूट नाते आहे. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे ४३०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी २०३१ बसेस फुल्ल झाल्या आहेत.

अर्थात, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

ML/ML/PGB
5 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *