बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी नसबंदी आणि बचाव केंद्रात वाढ
नागपूर दि ९ : राज्यातील अनेक भागात बिबट्यांचा वाढता त्रास , दहशत , त्यांचे हल्ले यावर उपाय म्हणून बिबट्यांना शेड्युल एक मधून दोन मध्ये आणण्यासाठी केंद्र सरकार कडे पाठपुरावा सुरू केला आहे, त्यांची नसबंदी करण्याची परवानगी केंद्राने दिली आहे, त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे याशिवाय त्यांना पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पिंजरे उपलब्ध करुन त्यांची बचाव केंद्र वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत दिली.
यासंदर्भातील लक्षवेधी सूचना जितेंद्र आव्हाड, अतुल भातखळकर आणि इतरांनी उपस्थित केली होती. सभागृहातील दोन्ही बाजूच्या सदस्यांच्या भावना यात तीव्र होत्या. वाघ आणि बिबटे हे शेड्युल एकमध्ये असल्याने त्यांना थेट मारता येत नाही मात्र बिबट्यांची वाढती संख्या पाहता त्यावर त्यांना शेड्युल दोन मध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असं मंत्री म्हणाले. अहिल्यानगर, पुणे त्यासोबतच ऊसाचे पीक असणाऱ्या भागात बिबट्यांचा वावर आणि अधिवास वाढत चालला आहे,त्यासाठी वन विभाग सतर्क आहे, त्यांना पकडून बचाव केंद्रात पाठवणे ही कारवाई करण्यात येत आहे.
मानव आणि वन्यप्राणी संघर्ष कमी करण्यासाठी जंगलात तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवली जाईल ,तोवर तात्पुरती व्यवस्था म्हणून जंगलात शेळ्या , बकऱ्या सोडल्या जातील असं मंत्री गणेश नाईक यावेळी म्हणाले. वन आणि खासगी जमिनी यामध्ये बांबूची लागवड करून हिंस्त्र प्राण्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.ML/ML/MS