दिल्ली ते गल्ली, भाजपची सारी ” गळती सरकार “

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान हट्टापोटी उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या इमारतीतून अवघ्या महिनाभरात पाणी गळू लागले, दिल्ली विमानतळाच्या विस्तारित भागाचे छप्पर २ महिन्यातच पावसाळ्यात उडून गळती सुरु झाली, लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी घाईने उद्घाटन केलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या गाभा-या बाहेर ३ महिन्यातच छतामधून पाणी टपकू लागले, तर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी घाईने सुरु केलेल्या मुंबईतील कोस्टल रोडच्या भिंतीतून ४ महिन्यातच पाणी झिरपू लागले आहे. यावरून केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून एनडीए – भाजप सरकारने घाईत सर्व प्रकल्प उरकल्याचे सिद्ध होते. एवढेच नव्हे तर यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचेही उघड झाले आहे. याच कारणास्तव भा ज प ची सारी सरकार ही ” गळती सरकार ” असल्याचा घणाघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत गाडगीळ यांनी केला आहे.
केवळ पायाभूत सुविधा प्रकल्पातच नव्हे तर भा. ज. प. / युतीच्या गैरकारभार – गैरनियोजन यामुळे देशाच्या
अर्थव्यवस्थेलाही गळती लागली असल्याचे स्पष्ट होत आहे. मोठा गाजावाजा झालेल्या ” स्मार्ट सिटी ” योजने अंतर्गत सुमारे १५ हजार कोटींचे प्रकल्प अजूनही अपुरे आहेत. एकूण सुमारे ८ हजार प्रकल्पांपैकी जवळपास ६५०० प्रकल्प कसेबसे पुरे होण्याच्या मार्गावर आहेत तर उर्वरित सुमारे २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची काम थोडीफार चालू झाली आहेत.
फसलेल्या नोटबंदी आणि जि. एस. टी. मुळे एकीकडे गेल्या वर्षभरात ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर दुसरीकडे दीड कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. गेल्या वर्षभरात ” सी एन जी ” २५ रुपयांनी महाग झाला आहे तर रेल्वेच्या गलथान कारभारामुळे गेल्या ४ वर्षात तब्ब्ल ४० रेल्वे अपघात झाले आहेत. परिणामी, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदानातच गळती लागल्याचे दिसून येईल असे प्रतिपादनही गाडगीळ यांनी केलं आहे.
ML/ML/SL
17 Nov. 2024