बेचाळीस आमदार आमच्यासोबत, नऊ जणांना अपात्र ठरवा

 बेचाळीस आमदार आमच्यासोबत, नऊ जणांना अपात्र ठरवा

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्हीच आहोत आमच्याकडे शपथ घेतलेले नऊ आमदार वगळता बेचाळीस आमदार आहेत असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. या नऊ लोकांना अपात्र ठरविण्यात यावे अशी याचिका देखील दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आम्ही विविध पत्रे आणि याचिका केल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेते पदी आणि मुख्य प्रतोद पदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक पक्षाने केली असून त्याला मान्यता देण्याची विनंती अध्यक्षांना केली आहे. ज्या नऊ आमदारांनी पक्षाच्या धोरणाविरोधात भूमिका घेत सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांना सदस्य म्हणून अपात्र करण्याची याचिका काल रात्री मेल , वॉट्स ॲप आणि प्रत्यक्ष विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे करण्यात आली आहे, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सकाळी आपल्याला फोन करून याचिका प्राप्त झाल्याचे सांगितले असून त्यावर सर्व बाजूने विचार करून निर्णय करू असेही त्यांनी सांगितले असे जयंत पाटील म्हणाले. यावर अध्यक्षांनी लवकरात लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती आपण केल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान जे आमदार त्या नऊ लोकांसोबत गेले आहेत त्यातील अनेक जणांनी आमच्याशी , शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे आणि परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे, त्यांना पुरेसा वेळ आम्ही देऊ असेही जयंत पाटील यांनी सांगितले. जे परत येणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

ML/KA/SL

3 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *