रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती…

रत्नागिरी दि १६:– गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजापूरमधील अर्जुना-कोदवली तर खेड तालुक्यातील जगबुडी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीने रविवारी रात्रीच इशारा पातळी ओलांडली आहे.
दरम्यान आज सकाळपासून राजापूरच्या कोदवली नदीचे पाणी राजापूर बाजारपेठेत शिरण्यास सुरुवात झाली. काही वेळातच संपूर्ण बाजारपेठेला पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने व्यापाऱ्यांनी आपले साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली आहे. राजापूर प्रमाणेच संगमेश्वर, खेड, चिपळूण, गुहागर, लांजा आदी तालुक्यातील काही गावांना पुराचा धोका कायम आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.ML/ML/MS