मत्स्य उद्योगात यापुढे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

धाराशिव दि ७– मत्स्य व्यवसायाला चांगले दिवस आणून मत्स्य व्यवसायिकांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी यापुढे या विभागाचे डिजिटलायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने प्रयत्न केले जाणार आहेत ,मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यासाठी मत्स्य व्यवसायिकांना विविध सवलती देण्यासह शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सोयी सवलती देण्यासंदर्भात आगामी काळात प्रयत्न करणार असून गोड्या पाण्यातील मासेमारी व्यवसायावर स्वतंत्र धोरण तयार करण्याचे राज्य सरकारच्या विचाराधीन असल्याचे प्रतिपादन राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी आज धाराशिव येथे पत्रकार परिषदेत केले.
यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोखर उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे पुढे म्हणाले की लातूर विभागात 500 पेक्षा जास्त तलाव आहेत, त्यावर चालणारा मत्स्य व्यवसाय आणि त्यावर अवलंबून असलेल्या मत्स्य व्यवसायिकांना आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयत्न आगामी काळात करणार आहोत. मासेमारी मध्ये महाराष्ट्र देशात 16 व्या क्रमांकावर आहे यात बदल करून महाराष्ट्र अव्वल स्थानी पोहोचवण्यासाठी वेगवेगळे उपाय आगामी काळात करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायात आणि मत्स्य व्यवसाय अंमलबजावणीत पारदर्शकता दिसली नाही, तलाव ठेका देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्याची गरज आहे, कारण तलाव ठेका एका मच्छिमार संस्थेच्या नावावर आणि तेथे दुसरीच संस्था काम करत आहे असे चित्र या जिल्ह्यात दिसल्याचे त्यांनी नमूद केले. मत्स्य व्यवसायाच्या ठिकाणी असलेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम आगामी काळात सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.