महाराष्ट्र, गुजरातच्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

मुंबई, दि. १० : गुजरात आणि महाराष्ट्र राज्यांच्या मत्स्यव्यवसाय विभागांनी मोठा निर्णय घेत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुजरात सरकारने तातडीने मासेमारीसाठी ट्रॉलर्सना टोकन देणे बंद केले असून, समुद्रात असलेल्या बोटींना बंदरात परतण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभागानेही अपतटीय संरक्षण क्षेत्रांमध्ये (offshore defence areas) मासेमारीस सक्त मनाई केली आहे. विशेषतः ‘नो फिशिंग झोन’ मध्ये प्रवेश टाळावा, असा इशारा देत ‘शूट-टू-किल’ आदेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानंतर काल हे आदेश जारी करण्यात आले. यामध्ये तेल विहिरीजवळ मासेमारी न करण्याचा, तसेच वादळी हवामानात तेथील आसऱ्याचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना राज्य सरकारने विशेष सुरक्षा सूचना दिल्या आहेत. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नौदल अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर किनारपट्टीवर टेहळणी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मासेमारी करणाऱ्या अधिकाधिक नौकांवर ट्रान्सपॉंडर बसवण्याचा प्रयत्न सुरू असून, यामुळे त्यांचे थेट लोकेशन ट्रॅक करता येईल.
पालघरच्या किनाऱ्यालगत मुंबईच्या उत्तरेस दोन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत, जिथे मच्छीमारांची गर्दी होत असे. त्या ठिकाणी एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. “नौदलाच्या सुरक्षेसाठी मच्छीमारांनी डोळे आणि कान बनावे, आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने कळवावी,” असे सरकारने स्पष्ट केले आहे.