आधी पुनर्वसन करा नंतरच प्रकल्प सुरू करा ; बोरिवली – ठाणे भूयारी मार्गाबद्दल शिवसेनेची सुस्पष्ट भूमिका

 आधी पुनर्वसन करा नंतरच प्रकल्प सुरू करा ; बोरिवली – ठाणे भूयारी मार्गाबद्दल शिवसेनेची सुस्पष्ट भूमिका

मुंबई, दि. 6 – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बोरिवली – ठाणे दुहेरी भूयारी मार्गाच्या प्रकल्पाच्या परिसरातील काही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. मागाठाणे येथील या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी आता काही विकासक पुढे आले आहेत. मात्र, हे प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन रहिवाशांना हक्काची घरे देण्याची हमी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने द्यावी, आधी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे नंतरच प्रकल्पाचे काम सुरू करावे अशी ठाम भूमिका शिवसेनेतर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्तांकडे मांडण्यात आली.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बोरिवली – ठाणे दुहेरी भूयारी मार्गाच्या प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पामुळे मागाठाणे येथील रुपवते नगर, फरलेवाडी – त्रिमूर्ती देवीपाडा आणि ९० फूट रोडवरील ५७२ रहिवाशी बाधित होणार आहे. या प्रकल्पाच्या काही भागात त्रिमूर्ती देवीपाडा (डिझर्व लॅण्ड डेव्हलपर्स), महाकाली एसआरए (पूर्वीचे विकासक – सोहम डेव्हलपर्स) , देवीपाडा एसआरए सोसायटी (आशापूरा, ए अॅण्ड ओ डेव्हलपर्स, दोस्ती डेव्हलपर्स) असे तीन एसआरए प्रकल्प ४ ते ७ वर्षांपासून रखडलेले आहेत. विकासकांनी या रहिवाशांचे कोट्यवधी रुपयांचे भाडे देखील थकवले आहे. यातील महाकाली एसआरए प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोहित कंबोज यांच्या ॲस्पेक्ट ग्लोबल व्हेंचर प्रा. लि. या कंपनीने प्रस्ताव पाठविला आहे.
आधीचा अनुभव पाहता रहिवाशांचा झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणि विकासकांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे वेळेत घर आणि भाडे मिळवून देण्याची हमी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने द्यावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मुखर्जी यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या मागणीला संजय मुखर्जी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उपलब्ध असलेल्या पीएपी घरांची माहिती देऊन कायमस्वरूपी देण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.
या बैठकीला माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, विभागसंघटक शुभदा शिंदे, विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, वैभवी तावडे, हनुमंत मोरे, अभिलाष कोंडविलकर, सचिन मोरे, माधुरी खानविलकर, तुकाराम पालव, नंदकुमार मोरे, रोहिणी चौगुले यांच्यासह या प्रकल्पामुळे बाधित झालेले रहिवाशी उपस्थित होते.
दुहेरी भूयारी मार्गाच्या प्रकल्पाला रहिवाशांचा विरोध नाही. लोकांना वेळेत घरे किंवा भाडे मिळवून देण्याची हमी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने द्यावी, एवढीच आमची मागणी आहे. त्याला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकल्पग्रस्तांपैकी ज्यांना घराऐवजी रकमेचा पर्याय हवा आहे अशा रहिवाशांसाठी खास मोहिम आयोजित करून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, ही आमची मागणी देखील मान्य करण्यात आली. यासंदर्भात झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रकल्पाची भूमिका जाणून घेण्यासाठी आम्ही लवकरच झोपडपट्टी पुनर्वसन योजना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत, अशी माहिती शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *