गोरेगावात भीषण आग; आठ जणांचा मृत्यू ; 40 ते 50 जण अत्यवस्थ
मुंबई दि.6( एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईतील गोरेगाव परिसरातील जय भवानी या पाच मजली इमारतीला शुक्रवारी पहाटे अडीच ते पावणेतीनच्या सुमारास भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर 40 ते 50 जण अत्यवस्थ असल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी कुपर आणि एचबीटी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
गोरेगाव पश्चिमेला जय भवानी ही पाच मजली एसआरएची बिल्डिंग आहे.या इमारतीला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला तीन वाजून पाच मिनिटांनी मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याच्या कार्याला सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत आग इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यापर्यंत पसरली होती. यामुळे आठ रहिवाशांचा मृत्यू झाला असून 30 – 50 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते.
या इमारतीच्या पार्किंगमध्ये कपड्याच्या चिंध्यांची गाठोडी ठेवली होती. यापैकी काही कापडी चिंध्यांना आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणांमध्येच आगीने रौद्ररूप धारण केले.या आगीत इमारतीच्या पार्किंगमध्ये असलेल्या ३० दुचाकी आणि चारचाकी वाहने जळून खाक झाली. कापडी चिंध्यांना लागलेल्या आगीमुळे काळा जाड धूर हा इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत जाऊन पोहोचला. खाली आग लागल्याने इमारतीमधील रहिवाशांना खाली येत आले नाही. अखेर अग्निशमन दलाने या सर्वांची सुटका केली. मात्र, तोपर्यंत काळा धूर नाकातोंडात गेल्याने अनेक रहिवाशांची प्रकृती बिघडली. सध्या अग्निशमन दलाने आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे.
ML/KA/SL
6 Oct. 2023