राहुल गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली

 राहुल गांधींना घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती बदनामी करण्यावर उतरली

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदु-मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण करुन तसेच जाती-जातीमध्ये द्वेष पसरवून सत्तेच्या जोरावर भाजपा देश तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधी मात्र संविधान, लोकशाही आणि देशातील एकता , अखंडता कायम रहावी यासाठी संघर्ष करत आहेत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलनी भाजपाच्या हुकूमशाही व्यवस्थे विरोधात जनतेत जागृती , विश्वास निर्माण केला. राहुल यांची वाढती लोकप्रियता पाहून घाबरून भाजपाची रावणप्रवृत्ती त्यांची बदनामी करण्यावर उतरली आहे पण राहुल गांधी यांच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

भाजपाच्या रावणप्रवृत्ती विरोधात काँग्रेसकडून राज्यभर निषेध आंदोलन करण्यात आले. मुंबईत चेंबूर रेल्वे स्टेशन जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी CWC सदस्य चंद्रकांत हंडोरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, १९४५ मध्ये ‘अग्रणी’ या मराठी वृत्तपत्रात महात्मा गांधींना रावणाच्या प्रतिमेत दाखवून भाजपा आणि संघाच्या लोकांनी त्यांची बदनामी केली होती आता त्याच प्रवृत्तींनी इतिहासाची पुनरावृत्ती करत राहुल गांधी यांना रावणाच्या प्रतिमेत दाखवून त्यांची बदनामी केली आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा देशाच्या रक्षणासाठी गांधीच पुढे येतात. या देशाला गांधींनी स्वातंत्र्य मिळवून दिले तसेच राष्ट्र म्हणून उभेही केले आहे.

रावणप्रवृत्तीच्या भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्यात काडीचाही संबंध नाही. आज राहुल गांधी यांची जनतेत लोकप्रियता प्रचंड वाढली आहे, ते जनतेचे नायक आहेत म्हणनूच भाजपाची खलनायकी प्रवृत्ती त्यांच्याविरोधात सातत्याने कारस्थाने करत आहे. भाजपाने राहुल यांची बदनामी केल्याचा संताप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तर आहेच पण सर्वसामान्य जनतेमधूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

महात्मा गांधी यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार काँग्रेस पक्षाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले आहे पण भाजपाने अति केले तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

ML/KA/SL

6 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *