कृषी विभागाच्या योजनांसाठी शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर केल्या जातात. या योजना खऱ्या लाभार्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता शेतकरी ओळख क्रमांक देणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या योजनांसाठी १५ एप्रिलपासून शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य असणार आहे. शेतकऱ्यांना या ओळख क्रमांकाशिवाय कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने अ ग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करावी, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. अन्यथा शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कोणत्याही योजनेचा लाभ १५ एप्रिलपासून घेता येणार नाही.
राज्य सरकारने कृषी विभागाला शेतकऱ्यांची ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी कृषी विभागाचे सर्व पोर्टल, संकेतस्थळ आणि ऑनलाईन प्रणालीत समन्वय साधण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच सर्व बाबी अग्रीस्टॅकशी जोडण्याची आदेश जमाबंदी आयुक्तांना दिले आहेत. यामध्ये शेतकरी ओळख क्रमांक आणि त्याचीशी संलग्न डेटाही, पिकांची माहिती जोडण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी अग्रीस्टॅक प्रकल्प राबवला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीकविमा, कर्जमाफी, अनुदान, पीक कर्ज, पीएम किसान, हमीभाव आदि योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करावी, असंही आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
शेतकरी जवळच्या सीएससीवर जाऊन अग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. सीएससी चालकांना एका अर्जासाठी १५ रुपये सरकारमार्फत दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीएससी चालकांना शुल्क देऊ नये, असं कृषी विभागाने सांगितलं आहे.
SL/ML/SL
12 April 2025