कोकणातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे दरवाजे १८ दिवस राहणार बंद

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी यांच्या जागृत मंदिरांमुळे दक्षिण काशी अशी ओळख असलेले हरिहरेश्वर हे कोकणातले तीर्थक्षेत्र पर्यटकांचेआवडते ठिकाण आहे. निसर्गरम्य अशा समुद्रकिनाऱ्याचकाठी वसलेल्या या स्थानावर वर्षभर गर्दी असते. मुंबई आणि पुणे या महानगरांपासून एका दिवसात जाऊन येण्यासारखे हे ठिकाण असल्याने पर्यटक या स्थळाला भेट देण्यास प्राधान्य देतात. देवदर्शनाबरोबरच येथे समुद्रसान्निध्याचाही मनमुराद आनंद घेता येतो. असे हे पर्यटकांचे आवडते असे धार्मिक आणि निसर्गपर्यटन स्थळ आता १८ दिवस बंद राहणार आहे.
रायगड जिल्यातील श्रीवर्धन तालुक्यातील प्रख्यात श्री.हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील मंदिरातील गाभारे मूर्तींच्या वज्रलेप या धार्मिक विधीसाठी १८ दिवस बंद राहणार आहेत. याच काळात भाविकांना दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्र्वर मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे. वज्रलेप विधी व मंदिरातील इतर दुरुस्ती कामे १५ फेब्रुवारी ते .३मार्चपर्यंत असे एकूण १८ दिवस करण्यात येणार आहे.
यामध्ये श्री देव हरिहरेश्वर व श्री देव कालभैरव योगेश्वरी या मंदिरांचे गाभारे बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तींच्या दर्षनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरातील गाभारे बंद ठेवण्यात येणार असल्याने अभिषेक पूजा तसेच कौलप्रसाद, चंदन पुजा बंद असणार आहे. मात्र, घाटावरील विधिवत कामकाज म्हणजे येथे होणारे मरणोत्तर दिवसकार्य अस्थीविसर्जन, पिंडदान त्या संबंधित इतर कामे चालू राहतील, अशी माहिती हरिहरेश्वर न्यासाने दिली आहे.
SL/KA/SL
10 Feb. 2024