टीकेची झोड उठताच फडणवीसांनी मलिकाना झिडकारले

नागपूर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधान परिषद सभागृहात नवाब मलिक यांच्याबद्दल मुद्दा उपस्थित करत फडणवीसांवर टीका होताच फडणवीस यांनी थेट अजितदादांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीतून लांब ठेवण्यास सांगितले आहे.
आज दुपारी विधान परिषद सभागृहात नवाब मलिक तुमच्या मांडीला मांडी लावून कसे बसले असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता, त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगेच उत्तरही दिले , मात्र सायंकाळी लगेच अजितदादांना पत्र लिहून देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपीला महायुतीत स्थान देऊ शकत नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.
नवाब मलिक हे विधानसभा सदस्य आहेत त्यांना विधिमंडळ कामकाजात भाग घेण्याचा अधिकार आहे मात्र सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा आहे, त्यांचेवरील आरोप सिद्ध न झाल्यास मलिक यांचे स्वागत आपण जरूर करावे. सध्या त्यांच्यावर अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य नाही असे आमचे स्पष्ट मत आहे असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महायुतीला बाधा पोहोचणार नाही याची काळजी सर्वच पक्षांना घ्यावी लागेल त्यामुळे आमचा मलिक यांना विरोध आहे. असे आरोप असणाऱ्यांना मंत्री पदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमत असणार नाही, आमच्या या भावनांची योग्य दखल घ्याल अशी अपेक्षा फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या या पत्रात व्यक्त केली आहे.
ML/KA/PGB 7 Dec 2023