ठाणे जिल्ह्यात वीज वितरण व्यवस्था होणार बळकट

ठाणे, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण , सुधारित वितरण क्षेत्र आणि बळकटीकरण करणे यासाठी साडे चार हजार कोटींचा विशेष आराखडा तयार करण्यात आला असून येत्या पाच ही योजना पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय पंचायत राज खात्याचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या एका उच्च स्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
साडेचार हजार कोटींपैकी साठ टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला असून उर्वरित निधी दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या प्रमाणात उबलब्ध करून देण्यात येणार आहे. यापैकी बाराशे कोटींची कामे येत्या दोन वर्षांत प्राधान्याने पूर्ण करायची असून त्यात उच्च आणि लघू दाबाच्या वाहिन्या भूमिगत करणे , नवीन वाहिन्या टाकणे, जुन्या तारा, खांब , रोहित्र बदलणे , रोहित्रांची क्षमता वाढविणे , स्मार्ट मीटर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. याचा फायदा जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ८५० गावांना होणार आहे अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली.
या कामांसाठी विस्तृत कार्य अहवाल तयार करण्यात आला असून वीज ग्राहकांना योग्य दाबाने आणि पुरेसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे.वीज यंत्रणा आधुनिकीकरण , बळकटीकरण आणि सुधारित वीज वितरण क्षेत्र तयार करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. Electricity distribution system will be strengthened in Thane district
ML/KA/PGB
8 Sep 2023