एकनाथ शिंदे झाले बरे, आता पुन्हा सरकार स्थापनेला वेग

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :गेले दोन दिवस आपल्या मूळ गावी आजारी असणारे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता बरे झाले असून आज त्यांनी प्रसार माध्यमांना सामोरे जात यापुढे आपण सरकार स्थापनेसाठी आपल्या सहकारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील वाटचाल करू असे स्पष्ट केले आहे. यामुळे गेले दोन दिवस रखडलेली महायुतीच्या सरकार स्थापनेची चर्चा उद्यापासून पुन्हा सुरू होईल आणि पाच तारखेला नवीन सरकारचा शपथविधी होईल असे आता स्पष्ट झाले आहे.
गृह खाते आणि विधानसभेचे अध्यक्ष पद मिळावे यासाठी एकनाथ शिंदे अडून बसले असून त्यामुळेच ते आपल्या मूळ गावी गेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यासोबतच ते आजारी पडल्याने कोणालाही भेटत नव्हते आणि प्रसार माध्यमांशी देखील चर्चा करत नव्हते. याच कारणांमुळे याबाबतीतला संभ्रम अधिक वाढला होता. मात्र आज त्यांनी आपण बरे झालो असून आता महायुतीतल्या आपल्या सहकारी नेत्यांशी चर्चा करून सरकार स्थापन संदर्भातील पुढील मार्ग काढू असे स्वतःच स्पष्ट केले आहे.
नेमक्या कोणत्या खात्यांवर आपण अडलो आहोत अथवा आपल्याला नेमकी कोणती खाती हवी आहेत या संदर्भात मात्र त्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. मुख्यमंत्री पदाबाबत त्यांनी पुन्हा एकदा बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेची आठवण प्रसार माध्यमांना करून दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांनी घेतलेला मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय आपल्याला मान्य असेल असे पुन्हा एकदा त्यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या तीन तारखेला भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असून त्यात पक्षाचा नेता निवडला जाईल त्यासाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह काही वरिष्ठ पदाधिकारी मुंबईत येणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात म्हणजेच पाच तारखेला आझाद मैदानावर जाहीर सोहळ्यात शपथविधी पूर्ण केला जाईल. त्या आधीच्या दोन दिवसात सरकारमधील मंत्रिमंडळाचा चेहरा नेमका काय असेल आणि घटक पक्षाला प्रत्येकी किती मंत्रिपदे मिळतील यावर खल होणे अपेक्षित आहे.
ML/ML/PGB 1 Dec 2024