पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; बचावकार्य सुरू

मुंबई दि ९ — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात पूर्व विदर्भातील मुसळधार पावसासंदर्भात माहिती देत येथील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पावसामुळे एस.टी. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना जवळच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले व नंतर सर्व प्रवाशांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे. गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग सध्या बंद असून, वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्याने, गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर शहरातील सखल भागांत पाणी साचल्याची दखल घेऊन, बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. या पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याचीही माहिती त्यांनी दिली.

पूर परिस्थिती लक्षात घेता एनडीआरएफ आणि एसडीआरएफ या दोन्ही यंत्रणांना सज्ज ठेवण्यात आले असून, नागपूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी, असे आवाहनदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी याविषयावर सभागृहात मुद्दा उपस्थित केला होता. ML/ML/MS