किडनी ट्रान्सप्लांटसाठी खोळंबलेल्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आले एकनाथ शिंदे

 किडनी ट्रान्सप्लांटसाठी खोळंबलेल्या बहिणीच्या मदतीसाठी धावून आले एकनाथ शिंदे

जळगाव दि ७:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले होते. तिथून मुंबईकडे परतत असताना विमानतळावर आल्यानंतर त्यांच्या उड्डाणाला थोडा विलंब झाला. मात्र हाच विलंब एका महिलेसाठी जीवनदान देणारा ठरला आहे.

जळगाव जिल्ह्यातील शीतल बोरडे या किडनी विकाराने त्रस्त होत्या. किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यासाठीच त्या विमानाने मुंबईकडे निघाल्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी शीतल याना तात्काळ मुंबईत पोहोचायचे होते. मात्र त्या विमानतळावर पोहोचण्याअधिच मुंबईकडे जाणारे विमान निघून गेल्याचे त्यांना समजले. मुंबईत वेळेत पोहोचणे त्यांच्यासाठी निव्वळ अशक्य होऊन बसले.

आता आपली किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया होऊ शकेल की नाही ही एकच चिंता त्यांना सतावू लागली. मात्र त्याचवेळी त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चार्टर्ड विमान जळगाव विमानतळावरूनच मुंबईकडे जाणार असल्याचे समजले. बोरडे यांनी आपली अडचण विमानतळावर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या कानावर घातली.

कार्यकर्त्यांनी ही बाब मंत्री गिरीश महाजन यांच्या कानावर घातली. महाजन यांनी या महिला आणि तिच्या पतीला आपल्या विमानातून मुंबईला घेऊन जाण्याची विनंती उपमुख्यमंत्री शिंदे यांना केली. क्षणाचाही विलंब न लावता शिंदे यांनी त्यासाठी होकार दिला. वेळ पडल्यास माझे दोन अधिकारी जळगाव मध्ये थांबतील पण माझ्या लाडक्या बहिणीला मी मुंबईला सोबत घेऊन जाणारच असे त्यांनी महाजन यांना सांगितले.

यानंतर सदर महिला आणि तिच्या पतीला आपल्या चार्टर्ड विमानातून उपमुख्यमंत्री शिंदे मुंबईत घेऊन आले. प्रवासादरम्यान त्यांनी या महिलेशी बोलून त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या महिलेला रुग्णालयातही दाखल केले.

उपमुख्यमंत्री शिंदे हे कायमच गरजूंच्या मदतीला धावून जातात हे सर्वश्रुत आहे. त्यांच्या संवेदनशील स्वभावाचा प्रत्यय अनेकदा लोकांना आला आहे. मात्र विमान चुकलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला धावून जात ते आजही ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहेत हेच त्यांच्या या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याचे मत या घटनेनंतर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *