कोकणात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, जनजीवन विस्कळित

सिंधुदुर्ग, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कोकणातील सर्व जिल्ह्यात कालपासून धुवाधार पाऊस कोसळत असून त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे, कोकणातील बहुतांश नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत तर काहींनी ही पातळी ओलांडली आहे, त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळित झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर खूप वाढला आहे. अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत .कणकवली विभागात पावसाचा जोर काहीसा जास्तच आहे. कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील वाघोटन नदीने सध्या इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खारेपाटण येथील बंदर वाडी , संम्यक नगर मार्ग बंद झाला आहे. मच्छी मार्केट पाण्याने वेढले आहे. खारेपाटण रेल्वे स्टेशन मार्ग बंद आहे. तर बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी दुकानातील माल बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे .रात्री पावसाचा जोर असाच राहिल्यास बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता आहे.
तेरेखोल नदी ने सुद्धा इशारा पातळी ओलांडली आहे. तेरेखोल नदी आणि वाघोटन नदी क्षेत्रातील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. खेड मधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर शास्त्री, काजळी, कोदवली, मुचकुंदी आदी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून धोका पातळीच्या जवळ पोहोचल्या आहेत. परिणामी खेड आणि राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. काजळी नदीला आलेल्या पुरामुळे अंजनारी पुलावरून दुपारच्या सुमारास पाणी वाहू लागले. त्यामुळे दुपार नंतर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक अंजणारी पुल येथे काही काळ थांबवण्यात आली होती. मात्र पाण्याचा अंदाज घेत ही वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
जिल्ह्यात असाच पाऊस सुरू राहिल्यास रत्नागिरी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासन देखील आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. दरम्यान हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने देखील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. Due to heavy rain in Konkan, flood situation, life disrupted
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी देखील इशारा पातळीवर वाहत असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचण्याच्या स्थितीत आहेत, प्रशासन यामुळे सज्ज झाले असून सर्वत्र जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र आहे.
ML/ML/PGB
21 July 2024