या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती

बीड, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा उशीरा सुरु झालेल्या पाऊसकाळ लांबून राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र नेहमी प्रमाणेच या वर्षी देखील मराठवाड्यामध्ये मात्र फारसा पाऊस झाला नाही. परतीच्या पावसानेही मराठवाड्याला विशेषतः बीड जिल्हयाला दगा दिला आहे. बीड जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.मात्र सरकारकडून ११ पैकी तीनच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळणे मुश्कील होऊन बसले आहे. कोरडा दुष्काळ सदृश परिस्थिती असताना जिल्ह्यातील तीनच तालुक्यात दुष्काळ जाहीर केल्यामुळे शेतकरी आणि शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत.
सरकारकडून बीड जिल्ह्यात केवळ वडवणी, धारूर आणि अंबाजोगाई या तीन तालुक्यातच दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यात सध्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्याचबरोबर दुष्काळजन्य परिस्थिती असल्यामुळे पिकाच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यामुळे खर्च झालेला देखील शेतकऱ्यांना निघणार नाही.
बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी; अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेत्यांमधून केली जात आहे.
SL/KA/SL
2 Nov 2023