निवडणुकीच्या विजयाचा उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये
मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : निवडणूक ही कार्यकर्त्यांची परीक्षा असून निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये. कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो त्याला जपले गेले पाहिजे असे सांगतानाच आता विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आज केले.
राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. येत्या विधानसभा निवडणुकीला आपण सामोरे जाणार असून त्यानुसार पक्ष संघटनेची बांधणी करायची असल्याचेही पवार यांनी सांगितले.
येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २५ वा वर्धापनदिन असून यानिमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबवविले जातील, असेही पवार यांनी सांगितले. अल्पसंख्याक समाजासाठी सर्वाधिक चांगले निर्णय हे महायुती सरकारच्या काळात घेतले आहेत. शिव – फुले – शाहू – आंबेडकरांची विचारधारा ही आपल्या पक्षाचा मूळ गाभा असून कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही ही विचारधारा सोडणार नाही, अशी भूमिका पवार यांनी स्पष्ट केली.
येणारी विधानसभा निवडणूक आपणा सर्वांसाठी महत्त्वाची असून त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रीत केले पाहिजे असे आवाहन राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही सर्वांनी अभूतपूर्व निर्णय घेतला. त्यावर महाराष्ट्राची जनता १०० टक्के शिक्कामोर्तब करेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात वैचारिक पातळी खालावलेली दिसली. मात्र, प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी कोणाविषयी टीकाटिप्पणी करताना मर्यादा ओलांडली नाही, याचा सुनिल तटकरे यांनी आवर्जून उल्लेख करतानाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे आपणच खरे वारसदार आहोत याचा अभिमान असल्याचे तटकरे म्हणाले. निवडणुकीच्या विजयाचा उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये
Don’t get hysterical about electoral victories and don’t get tired of defeats
ML/ML/PGB
27 May 2024