शेतकऱ्यांना कर्ज देताना CIBIL मागू नका, मुख्यमंत्र्यांचे बँकांना आदेश

मुंबई, दि. १९ : आज मुंबईत राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना बँकांनी सिबिलची मागणी करू नये, असे आदेश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ICICI, HDFC आणि Axis या खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांना चांगलेच खडेबोल सुनावले. ते म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्याकडे सिबिलची मागणी करू नये. रिझर्व्ह बँकेचे तसे आदेश आहेत. पण त्यानंतरही शेतकऱ्यांना सिबिल मागितले जाते. त्यामुळे आम्ही अशा बँकांवर एफआयआर दाखल केला आहे. तुम्हाला हे गांभिर्याने घ्यावेच लागेल. पर्यायी तोडगा काढावाच लागेल.
यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती नाही. चांगले पीक-पाणी येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे बँकांनीही शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रात एफपीओ मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्रात MSMEs ही मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघही चांगला आहे. राज्य स्टार्टअपची राजधानी होण्याच्या मार्गावर आहे. दावोसमधूनही 16 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. त्यामुळे बँकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले तर रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल, असे फडणवीस म्हणाले.
बँका व वित्त पुरवठा करणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांना कृषि कर्ज देताना सिबिल स्कोअरची अट घालतात. त्यामु्ळे शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी सावकाराकडे धाव घ्यावी लागते. त्यातून त्याला आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागते. रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच शेतकऱ्यांसाठी सिबिलची अट नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण त्यानंतरही बँकांकडून त्याची मागणी केली जाते. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या आदेशांनंतर या स्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.