डिजिटल सूचना फलकांमुळे मुंबईकरांना दिलासा?
आपत्कालीन माहितीसाठी प्रस्ताव चर्चेत
मुंबई, दि ३०: शहरातील वाहतूक कोंडी, रस्ते दुरुस्ती आणि पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्यांमुळे त्रस्त मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी ‘डिजिटल सूचना फलक’ उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. एमआयएमचे नगरसेवक जमीर कुरेशी यांनी पालिका सभागृहात याबाबत ठरावाची सूचना मांडली असून यावर सभागृह काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत सध्या विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली आहे. त्यातच येत्या पावसाळ्यात सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांना अचूक आणि तत्काळ माहिती मिळणे आवश्यक ठरते. अनेकदा रस्ते बंद असणे किंवा पाणी साचल्याने पर्यायी मार्ग कोणता घ्यावा, याबाबत वाहनचालक संभ्रमात पडतात.
या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते, उड्डाणपूल आणि गर्दीच्या चौकांमध्ये ‘डिजिटल सूचना फलक’ उभारून वाहतूक कोंडी, रस्ते बंद, पाणी साचलेले भाग तसेच पर्यायी मार्ग यांची माहिती देण्यात यावी, अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीतही नागरिकांना योग्य दिशा मिळू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
सेन्सर आधारित पार्किंग सिस्टिमचीही मागणी!
वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईत पार्किंगची समस्या अधिकच गंभीर होत आहे. यावर उपाय म्हणून संपूर्ण शहरात ‘सेन्सर आधारित रिअल टाईम पार्किंग सिस्टिम’ कार्यान्वित करण्याची मागणीही ठरावाद्वारे करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे वाहनचालकांना उपलब्ध पार्किंगची माहिती तत्काळ मिळू शकते आणि अनावश्यक फिरणे टाळता येईल. एकूणच, डिजिटल सुविधा वापरून वाहतूक आणि पार्किंग व्यवस्थापन सुधारण्याचा हा प्रस्ताव असून, तो प्रत्यक्षात आला तर मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा फरक पडण्याची शक्यता आहे.JS/ML/MS