धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणांमुळे मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला, असे धनंजय मुंडे यांनी एका ट्विटद्वारे स्पष्ट केले आहे.राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येशी संबंधित खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडला अटक करण्यात आली. त्यामुळे विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण महायुती सरकारने आजपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्यास चालढकल केली. पण अखेर सोमवारी देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सरकारचा नाईलाज झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. त्यानुसार धनंजय मुंडे यांनी आज सकाळी आपला राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असे धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.