कृषीमंत्री धनंजय मुंडे गोगलगायी साठी पोहोचले बांधावर

बीड , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन व कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या आधारे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पाहणी केली . गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे एकूण उत्पन्नावर जर परिणाम होणार असेल तर या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे केले जावेत व उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करता यावे यासाठी मदत व पुनर्वसन विभागाशी दूरध्वनीवरून बोलून मुंडे यांनी उद्या सायंकाळपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित होतील असे म्हटले आहे. राज्याचे कृषीमंत्री मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात दाखल होताच परळी तालुक्यातील बेलंबा, वाघबेट या परिसरातील सोयाबीन, कपाशी आदी गोगलगायीनी प्रभावित झालेल्या क्षेत्राची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोगलगायींना नष्ट करण्याच्या विविध औषधी आणि उपाययोजनांबाबतही माहिती घेतली. गोगलगायींना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मेटाडेल हे औषध बाजारात सहजरीत्या उपलब्ध असून त्याची किंमतही फार जास्त नाही; तेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कृषी विभागाला राखीव ठेवण्यात येणाऱ्या निधीमधून या औषधाची खरेदी कृषी विभागाला करता येईल का? याबाबत चाचपणी करून तातडीने निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. *पिकं तुडवू नका रे!*दरम्यान बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून बऱ्याच ठिकाणी उशिरा पेरण्या झालेल्या आहेत. सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके हे हातभरही उगवलेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासोबत पाहणी करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी व शेतकरी हे बांधावर आले असता धनंजय मुंडे यांनी “पिकं तुडवू नका रे… आधीच थोडं उगवलं आहे, आपल्या पायांनी आणखी त्यांचे नुकसान करू नका!” अशा सक्तीच्या सूचना सर्वांनाच दिल्या.
ML/KA/PGB 21 July 2023