देवेंद्र फडणवीस यांचे राहुल गांधींना सडेतोड उत्तर

मुंबई दि ८– जनतेने ज्यांना नाकारले, ते जनादेशाला नाकारतात अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करत त्यांनी काल वर्तमानपत्रातून उपस्थित केलेले महाराष्ट्र निवडणुकीबाबतचे सर्व आरोप
पुराव्यांसह खोडून काढले आहेत. ज्या 3 वृत्तपत्रांत राहुल गांधींचे लेख आले, त्याच 3 वृत्तपत्रांत फडणवीसांचेही लेख आले आहेत.
लेखाची सुरुवात करताना गडचिरोली दौर्यापासून केली आहे. बंदूक घेतलेला नक्षलवादी संपविणे सोपे, पण अर्बन नक्षली मानसिकता संपवायला वेळ लागेल असे म्हणत, भारत जोडोच्या नावाखाली चालविलेल्या भारत तोडो अभियानात डॉ. मनमोहन सिंग यांनी ठरविलेल्या किती नक्षली संघटना होत्या, याचे करुन स्मरण करून दिले आहे.
फडणवीसांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत 19 डिसेंबर 2024 रोजी केलेल्या भाषणाचे स्मरण करुन दिले आहे . एकदा पराभव स्वीकारुन आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल असा सल्ला फडणवीस यांनी राहुल गांधींना दिला आहे. बिहारसह आगामी विधानसभा निवडणुकांच्या पराभवाची कारणेही त्यांना आतापासून तयार करायची आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
फडणवीसांनी दिलेल्या उत्तरात
- मुद्दा पहिला : 1950 पासून नवीन कायदा अस्तित्वात येईस्तोवर मुख्य निवडणूक आयुक्त तुमच्या काँग्रेस सरकारने थेट नियुक्त केले. आतापर्यंतच्या 26 पैकी 25 आयुक्त तुम्ही केंद्र सरकारकडून थेट नेमले. पहिल्यांदा मोदीजींनी त्यात विरोधी पक्षनेता किंवा सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा नेता असलेली समिती नियुक्त केली. पण, लोकशाहीला भक्कम करणारे आणि तुमच्या काळात कधीही पाळले न गेलेले पाऊल तुम्हाला आवडलेले दिसत नाही, असा टोला लगावला आहे.
दुसरा मुद्दा : मतदारवाढीचा!
विधानसभा निवडणुकीत 40,81,229 मतदारांपैकी 26,46,608 मतदार हे युवा मतदार होते. नवीन मतदारांची नोंदणी, त्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचा सहभाग, त्यावरील सुनावणीची पद्धत याबाबत निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी आपल्या पक्षाच्या विधी, मानवाधिकार आणि आरटीआय विभागाचे वकील ओमर हूडा यांना सविस्तर 60 पानांचे पत्र पाठविले आहे, त्यात सर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. ते आपल्यापर्यंत पोहोचले नसेल तर एकदा मागवून आवर्जून वाचावे.
जुनी आकडेवारी दिली.
2014 ते 2019 या काळात : 63 लाख नवीन मतदार
2009 ते 2014 या काळात 75 लाख नवीन मतदार
2004 ते 2009 या काळात 1 कोटी नवीन मतदार
म्हणजे 2024 मध्ये काहीतरी दिव्य घडले, असे अजीबात नाही.
लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांदरम्यान किती मतदार वाढले ही आकडेवारी सुद्धा दिली
2004 : लोकसभेपेक्षा विधानसभेत 5 टक्के अधिक.
2009 मध्ये 4 टक्के अधिक,
2014 मध्ये 3 टक्के अधिक,
2019 मध्ये 1 टक्का अधिक,
2024 मध्ये 4 टक्के अधिक आहे. त्यामुळे पुन्हा 2024 मध्ये काहीही नवीन घडले असे नाही.
तिसरा मुद्दा : अधिक मतदानाचा !
दिवसभर झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली तर प्रतितास सरासरी 5.83 टक्के इतके मतदान झाले.
त्यामुळे शेवटच्या 1 तासात 7.83 टक्के इतकी वाढ झाली आहे, असे सांगून आपण काय नवीन सांगतो आहोत?याचा विचार गांधींनी केला पाहिजे.
सायं. 5 ते 6 ही सुद्धा मतदानाची वेळ आहे आणि 6 पर्यंत बुथवर आलेल्या प्रत्येकाला मतदानाचा हक्क बजावता येतो, ही बाब राहुल गांधी माहिती नाही काय?
फडणवीसांच्या कार्यालयाने ‘लोकसत्ता’ मध्येच 3 डिसेंबर 2024 रोजी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ दिला आहे.
2024 च्या लोकसभेच्या दुसर्या टप्प्यात सायं. 5 वाजता दिलेली मतदानाची आकडेवारी 60.96 टक्के इतकी, जी दुसर्या दिवशी 66.71 टक्के इतकी अंतिम झाली. यातील वाढ 5.75 टक्के इतकी पण, ती निवडणूक तुम्ही जिंकलात म्हणून लपवून ठेवणार का?
चौथा मुद्दा : अर्धवटपणाचा
यात राहुल गांधी यांचे म्हणणे आहे की, केवळ 85 मतदारसंघात 12 हजार मतदान केंद्रांवर वाढीव मतदारांची संख्या होती आणि यापैकी बहुतेक जागा एनडीएच्या पारड्यात गेल्या. सायंकाळी 6 नंतर झालेले मतदान हे 17 लाख 70 हजार 867 इतके आहे. दिवसभराच्या मतदानाच्या सरासरीनुसार, 1 लाख 427 मतदानकेंद्रावर प्रतिमिनिट 97,103.32 इतके मतदान झाले आहे. त्यामुळे जे मतदान सायं. 6 नंतर झाले आहे, त्याची सरासरी काढली तर अतिरिक्त लागलेला वेळ हा केवळ 18 मिनिटे 23 सेकंंद इतका आहे .
ज्या मतदारसंघात शेवटच्या क्षणी मतदार टक्केवारीत वाढ झाली तेथे एनडीएच जिंकली, हे तर आणखी हास्यास्पद आहे. कामठीचे उदाहरण त्यांनी दिले. पण जे उदाहरण त्यांनी दिले नाही, ते मी येथे देतो आहे. माढ्यात 18 टक्के वाढ जेथे शरद पवार गटाचा उमेदवार जिंकला, वणीत 13 टक्के वाढ जेथे उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार जिंकला.
श्रीरामपूर येथे 12 टक्के वाढ जेथे काँग्रेस जिंकली.
पाचवा अर्थहीन मुद्दा
राहुल गांधी हे सातत्याने लोकशाही प्रक्रियेचा अपमान करतात.सातत्याने जनादेशाचा अपमान करतात. जनतेने राहुल गांधींना नाकारले, त्याचा बदला म्हणून ते जनतेला नाकारत आहेत. यातून काँग्रेस पक्ष आणखी गर्तेत जाणार आहे. आपल्याच पक्षाचे आमदार राहुल गांधी यांची एक दिवसात भेट घेऊन दाखवा, अशी विधाने का करतात? यावर त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
सातत्याने लोकशाही प्रक्रियेवर आणि संवैधानिक संस्थांवर शंका उपस्थित करुन आपण देशाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहोत, कोणते विष कालवत आहोत, याचे भान ठेवले पाहिजे.
महाराष्ट्रात झालेला पराभव हा किती जिव्हारी लागला, याची मला जाणीव आहे. पण, सातत्याने महाराष्ट्रातील शेतकर्यांचा, लाडक्या बहिणींचा, सामान्यजनांचा आणि इतरही नागरिकांच्या कौलाचा तुम्ही असा अपमान करणार असाल, तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या या अपमानाचा, मुख्यमंत्री या नात्याने त्यांचा सेवक म्हणून मी याचा कायमच निषेधच करीन असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या उत्तरात शेवटी म्हटले आहे.