या दिवशी राज्यात साजरा होणार ‘देशी गोवंश जतन-संवर्धन दिन’

 या दिवशी राज्यात साजरा होणार ‘देशी गोवंश जतन-संवर्धन दिन’

महाराष्ट्र सरकारने 22 जुलै हा दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या शिफारशीवरून पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय लागू केला आहे. महाराष्ट्र गोसेवा आयोगाने पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाला पत्र लिहून देशी गाईंच्या संवर्धनासाठी हा दिवस साजरा करण्याची मागणी केली होती. आयोगाने नमूद केले की, संकरित गाईंच्या तुलनेत शुद्ध देशी गाईंची संख्या झपाट्याने कमी होत आहे. यामुळे देशी गोवंशाच्या प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे.

सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, देशी गाईंच्या पालनपोषणाला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, ग्राहकांना देशी गाईंच्या उत्पादनांवर (दूध, गोमूत्र, शेण) आधारित वस्तूंच्या वापरासाठी प्रेरित केले जाईल. यासाठी राज्यभरात चर्चासत्रे, प्रदर्शने, कार्यशाळा आणि स्पर्धांचे आयोजन केले जाईल. या कार्यक्रमांचा खर्च महाराष्ट्र गोसेवा आयोग उचलणार आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त आयुक्त आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या सदस्य सचिव डॉ. मंजूषा पुंडलिक यांनी सांगितले, “देशी गाई प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. प्रतिकूल हवामानात टिकण्याची क्षमता, मजबूत आरोग्य आणि कमी खर्चात व्यवस्थापन ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. सेंद्रिय शेती आणि पर्यावरण संरक्षणासाठी देशी गाईंची भूमिका महत्त्वाची आहे. या दिवसाच्या माध्यमातून समाजात त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण होईल.”

देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. शेतकऱ्यांना देशी गाईंच्या पालनासाठी बाजारपेठ आणि ग्राहकांना त्यांच्या उत्पादनांचा वापर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासह सेंद्रिय शेतीलाही प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *