*निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींमुळे लोकशाहीला धोका

मुंबई, दि 8
निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे संविधानिक दर्जा असणाऱ्या निवडणूक आयोगावर संशय घेणे; निवडणूक प्रक्रियेवर सतत शंका घेणे चुकीचे आहे. राहुल गांधींनी घेतलेल्या शंकांचे निरसन निवडणूक आयोगाने केल्यानंतरही जाणीवपूर्वक निवडणूक प्रक्रियेवर शंका घेणाऱ्या राहुल गांधींमुळे लोकशाहीला धोका आहे अशी घणाघाती टीका रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज राहुल गांधींवर केली.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत राहुल गांधी यांनी आपल्या लेखात शंका उपस्थित करून निवडणूक आयोगावर आरोप केले. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेत गैरसमज पसरवण्यासाठी ; फेक नरेटीव्ह पसरवण्यासाठी राहुल गांधी निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित करीत आहेत. मतदानाचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. मतदान केंद्रात आलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करेपर्यंत मतदान केंद्र सुरू राहणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात लोक आले. मतदान केंद्रात आलेल्या प्रत्येकाचे मतदान होईपर्यंत मतदान केंद्र सुरू ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर काही आक्षेप असल्यास त्याच दिवशी आक्षेप घ्यायचे असतात त्याचे निरसन निवडणूक आयोग करीत असतो. निवडणुका प्रक्रियेवर झालेल्या सर्व आक्षेपांचे निवडणूक आयोगाने निरसन केल्यानंतरही राहुल गांधी सतत निवडणूक प्रक्रियेवर खोटे आरोप करतात. शंका उपस्थित करतात. हे लोकशाहीला घातक आहे अस टोला ना.रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांना लगावला.
काँग्रेसच्या काळात ईव्हीएम मशीन द्वारे मतदान झाले 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेसला ईव्हीएम मशीनद्वारे घेतलेल्या निवडणुकीत बहुमत मिळाले; तेव्हा राहुल गांधींना ईव्हीएम मशीन आणि मतदान प्रक्रियेत काही गडबड दिसले नाही का ?आता मात्र ते सारखे निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत असतात. शंका व्यक्त करतात हे राहुल गांधींचे धोरण दुटप्पी आहे. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींनी महायुतीला भरघोस मतदान दिल्यामुळेच महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले आहे .काँग्रेसचे संविधान बदलण्याचे फेक नरेटीव्ह उघडे पडल्याने आंबेडकरी जनतेने महायुतीला भरघोस मतदान केले. त्यामुळे महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. राहुल गांधी हे मतदान प्रक्रियेवर संशय घेऊन मतदारांचा अवमान करीत आहेत. राहुल गांधी यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांना जनतेने का नाकारले आहे याचा विचार करावा .निवडणूक आयोगावर खोटे आरोप करून लोकशाहीला धोका देण्याचे काम राहुल गांधींनी करू नये अशा शब्दात ना .रामदास आठवले यांनी राहुल गांधींचे आरोप खोडून काढले आहेत.