विकसित महाराष्ट्रासाठी प्रविण दरेकर यांचे स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे व्हिजन महत्वाचे

 विकसित महाराष्ट्रासाठी प्रविण दरेकर यांचे स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाचे व्हिजन महत्वाचे

मुंबई दि २८ – स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांचा आज गृहनिर्माण भवन येथे पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रविण दरेकर स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे व्हिजन तयार करतील ते पुढच्या विकसित महाराष्ट्रासाठी महत्वाचे ठरणार असल्याचे प्रतिपादन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. तर दरेकर यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण हे ऐतिहासिक प्राधिकरण म्हणून काम करेल, असा विश्वास उपस्थितांना दिला.

या सोहळ्याला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ऍड. आशिष शेलार, भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम, मुंबई उपनगर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण व सहकार राज्यमंत्री पंकज भोयर, उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी आमदार भाई गिरकर, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जैस्वाल, आ. प्रसाद लाड, चित्रा वाघ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष विद्याधर अनास्कर, मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई बॅंकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, यांसह मोठ्या संख्येने सहकार, गृहनिर्माण क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले कि, या प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबईतील गरीब माणसाला घरे मिळावीत हा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय त्यासाठी प्रविण दरेकर यांची नियुक्ती झाल्यावर आज हा सोहळा होतोय. राज्यातील गरिबांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने तयार केलेली सर्वांसाठी घरे या योजनेच्या माध्यमातून व देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबईतील महसूलच्या जागा, मिलच्या जागा, खासगी जागा आहेत त्यांचा एकंदरीत विकास करण्यासाठी या प्राधिकरणाची गरज होती. अनन्य साधारण महत्व या प्राधिकरणाला आहे.

२०२९, २०३४, २०४७ चा महाराष्ट्र १६ विभागामध्ये नवीन योजना होऊन कसा असावा याचे नुकतेच प्रेझेंटेशन झाले. त्यात राज्याच्या वेगवेगळ्या १६ विभागानी विकसित महाराष्ट्राबाबत काय भूमिका असाव्यात याबाबत मुख्यमंत्र्यांनी व्हिजन तयार केलेय. हे प्रेझेंटेशन होत असताना गृहनिर्माण विभागाने काय केले पाहिजे याची ब्ल्यू प्रिंट तयार करण्याची योजना मंत्रिमंडळाने मंजूर केली. या प्राधिकरणाच्या माध्यमातून दरेकरांनी राज्याचा अभ्यास केलाय. त्याचा फायदा विकसित महाराष्ट्रासाठी होणार आहे. महसूलच्या ज्या जागा आहेत त्यावर गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यांचे बांधकाम करायचे असेल तर महसूल खात्याचे धोरण काय असले पाहिजे, सुधारणा काय केल्या पाहिजेत यासाठी स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाला त्याचे काम देणार आहोत.

दरेकर प्राधिकरणाचे व्हिजन तयार करतील ते पुढच्या विकसित महाराष्ट्रासाठी महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मार्गदर्शन याला निश्चित न्याय देऊन दरेकर विकसित महाराष्ट्र ही संकल्पना पुढे नेतील, असा विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

यावेळी स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर म्हणाले कि, सगळ्यात मोठी बँक माणुसकीची आहे. स्वयंपुनर्विकास योजना विना विकासक इमारत उभी करणे आहे. देवाभाऊंचे पाठबळ हेच या स्वयंपुनर्विकासाचे बळ आहे. मराठी माणसाला, मोडकळीस आलेल्या, २५-३० वर्ष झालेल्या इमारतीचा पुनर्विकास करून मोठे घर मिळेल यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरेकर समिती नेमली. मी तीन महिने राज्यात फिरलो. परिपूर्ण असा अभ्यासगटाचा अहवाल सरकारला दिला. सरकारने तो अहवाल जसाच्या तसा स्वीकारला.

माझी प्राधिकरणाची मागणी मान्य केली व त्याची जबाबदारीही माझ्यावर सोपवली. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत ही योजना चालणार आहे. चिरंतर चालणारा हा विषय असून सरकारने याला पाठबळ देण्याची गरज आहे. माझ्या अभ्यास गटाच्या शिफारशी आहेत त्या शासनाने स्वीकारल्या असून त्याबाबत अध्यादेश काढावेत. मुंबईला स्वयंपुनर्विकास हा विषय लागू आहे. मुंबईला काढलेला अध्यादेश संपूर्ण राज्यभरात लागू करावा. नियोजन, प्राधिकरण व प्लॅनींगचे पूर्ण अधिकार असावेत, असेही दरेकर म्हणाले. तसेच मराठी माणसाबाबत बोलून चालत नाही कृती करावी लागते.

मराठी माणूस मुंबई बाहेर वसई, विरार, नालासोपारा, कसाऱ्यापर्यंत गेला. त्याची कधी काळजी केली नाही. नुसत्या गप्पा मारून चालत नाही कृती करावी लागते आणि ती कृती देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. या योजनेच्या यशाचे खरे धनी देवाभाऊ आहेत. देवाभाऊंसारखे बळ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही द्यावे. त्यांनी या प्राधिकरणाचे पालकत्व घ्यावे. ऐतिहासिक प्राधिकरण म्हणून हे प्राधिकरण काम करेल असा विश्वास दरेकरांनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी मंत्री आशिष शेलार यांनी आपल्या मनोगतात म्हटले कि, भाडेकरूंना महत्वाचे फायदे सुलभतेने मिळावेत याचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाडेकरूंनी, नागरिकांनी ही चळवळ मोठ्या प्रमाणावर केल्यावर लक्षात आले कि काही अंशी विकासक घेणारा फायदा व मूळ राहणाऱ्या भाडेकरूंना होणारा याचा उपयोग यामध्ये बऱ्याच तक्रारी आहेत. हा सर्व विभाग मुंबईसह महाराष्ट्रासाठी असेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानातील नागरिकाला जास्तीचा फायदा मिळून त्याला अधिकार दिला पाहिजे हा मूलभूत विचार डोळ्यासमोर ठेवून स्वयंपुनर्विकासाला गतिमान करण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीसांनी केले. त्यामागचे सर्व श्रेय दरेकरांना आहे.

सामान्य माणसाच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या इवल्याच्या भूमिकेची ही सुरुवात आहे. बोलणार भाषण करत राहतील, मी, मुंबईकर, मुंबई या विषयावर बोलत राहतील. बोलणार बोलघेवडेपणा करतील व प्रविण दरेकर, भाजपा, मुख्यमंत्री प्रत्यक्षात कर्मवीर म्हणून काम करतील, अशा शुभेच्छाही शेलार यांनी दिल्या.

गृहनिर्माण व सहकार राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले कि, संपूर्ण जगात २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष साजरे करत असताना राज्याच्या गृहनिर्माण विभागात स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करून त्याच्या अध्यक्ष पदी दरेकरांची निवड केली त्याबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार व्यक्त करतो. दरेकरांनी सर्वप्रथम ही चळवळ उभी करून २२ प्रकल्प उभे केले. मुंबईतील माणसाला घर घेण्यासाठी लढा उभा करावा लागतो त्या चळवळीत सहभागी होऊन लोकांना एकत्रित करून स्वतःच्या इमारतीचा स्वयंपुनर्विकास करण्याचे धोरण तयार केले. ते राज्यासमोर मांडले, राज्याने ते स्वीकारलेही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चळवळीचे करतेधरते दरेकरांच्या हाती सूत्रे सोपावल्याचे भोयर म्हणाले.

आजपासून मुंबईच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल

मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम म्हणाले कि, आज स्वयंपुनर्विकासाच्या प्राधिकरणाचा ताबा घेत असताना अगोदरच आपल्या माध्यमातून २२ प्रकल्प पूर्ण झालेत. मुंबई शहरात २२ यशस्वी प्रकल्प पूर्ण करणाऱ्या प्रविण दरेकर यांच्या हातात हे प्राधिकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेय. आजपासून मुंबईच्या विकासाला एक नवी दिशा मिळेल. येणाऱ्या काळात मुंबईतील सर्व सोसायट्या, त्यांच्या फेडरेशनला एका व्यासपीठावर आणून त्यांना स्वयंपुनर्विकासासाठी प्रेरित करून दिशा दाखविण्याचे काम प्राधिकरणामार्फत व्हावे. मुंबईतील मराठी माणसाचा स्वयंपुनर्विकास कोण घडवून आणतेय किंवा २५ वर्षापर्यंत मुंबईकराला वाळवीसारखे कुणी खाल्ले असा प्रश्न उपस्थित करत साटम पुढे म्हणाले कि, मुंबई शहरात गेल्या ११ वर्षात जे काम झालेय, क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणण्याचे काम देवाभाऊंच्या सरकारच्या माध्यमातून व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार सुरु आहे. त्याला खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचे काम स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण नक्कीच करेल.ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *