बृहन्मुंबईत 15 दिवसांसाठी जमावबंदी आदेश लागू
मुंबई दि.28(एम एमसी न्यूज नेटवर्क): बृहन्मुंबई शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि संभाव्य अशांतता टाळण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार 30 मार्चपासून 13 एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावधीत पाच किंवा अधिक जणांच्या जमावबंदीबरोबरच मिरवणुका व लाऊडस्पीकरच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
पोलीस उपआयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या तरतुदीनुसार हा आदेश जारी केला आहे. यामध्ये काही महत्त्वाच्या बाबींना वगळण्यात आले असून, लग्न समारंभ, अंत्यसंस्कार, शैक्षणिक उपक्रम, सरकारी व निमशासकीय कार्ये, सामाजिक मेळावे आणि अधिकृत परवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना सूट देण्यात आली आहे.
तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा आदेश 27 मार्च रोजी जारी करण्यात आला असून, तो सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.