सभागृहा बाहेर टीका आणि दालनात मात्र गुफ्तगू…

 सभागृहा बाहेर टीका आणि दालनात मात्र गुफ्तगू…

नागपूर दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर मध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली. थोडा वेळ सभागृहामध्ये थांबल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, सध्या अस्तित्वात असलेल्या फडणवीस सरकार वरती यथेच्छ टीकाही केली आणि त्यानंतर लगेचच फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांची सदिच्छा भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सुमारे दहा मिनिटं त्यांच्याशी बंद दाराआड गुफ्तगू देखील केले.

उद्धव ठाकरे यांनी आज हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सभागृहात सुमारे तासभर हजेरी लावली त्यानंतर बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि विद्यमान सरकारवर टीका देखील केली. ईव्हीएम् सह विविध मुद्द्यांवरील तेच तेच आरोप पुन्हा करत ठाकरे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. पण, पत्रकार परिषदेत बोलता त्या गोष्टी तुम्ही विधानपरिषदेत सदस्य म्हणून कधी मांडणार या प्रश्नावर ठाकरे यांनी अजब तर्कट मांडले. मी पक्षप्रमुख आहे आणि माझे सहकारी सभागृहात हे मुद्दे मांडतील, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, नरेन्द्र मोदीही खासदार आहेत ना मग ते लोकसभेत खासदार म्हणून प्रश्न मांडतात का, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

विधिमंडळात शिवसेना उबाठाच्या पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेमधे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मासलेवाईक सूचनांचा प्रत्यय पुन्हा एकदा दिला. ईव्हीएमसरकार असा फडणवीस सरकारचा उल्लेख करत ते म्हणाले की, निवडणूक आयुक्त सरकारच नेमते आणि ते आपल्या सोयीचेच लोक नेमतात. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्तही निवडणुकीतून निवडून आलेले असावेत, अशी माझी मागणी आहे. छगन भुजबळ नाराज आहेत आणि मला त्यांच्याबद्दल वाईट वाटत आहे, असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की, आत्ता त्यांचा माझा संपर्क झालेला नाही पण एरवी माझा आणि त्यांचा संपर्क होत असतो. ते माझ्या संपर्कात असतात, असेही ते म्हणाले.

ML/ML/SL

17 Dec. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *