श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा वादात, चारही शंकराचार्य अनुपस्थित

अयोध्या, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे १० दिवस बाकी आहे. अभूतपूर्व अशा या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु असून देशभरातील साधु संतांना या विशेष कार्यक्रमातचे निमंत्रण देण्यात आले आहे. असे असले तरिही मंदिरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नसताना मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करणे धर्मशास्त्रानुसार अयोग्य असल्याची चर्चाही धर्मधरिणांमध्ये सुरु आहे. राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाला चारही शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. मंदिर अद्याप पूर्णपणे निर्माण झालेले नाही, त्यामुळे बांधकाम पूर्ण न झालेल्या मंदिरात देव बसवणे धार्मिक नाही. आम्ही मोदीविरोधी नाही, पण आम्हाला धर्मविरोधीही व्हायचे नाही, असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे.
ज्योतिर्मठ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले आहे की, देशातील चारही शंकराचार्य 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या मते हा कार्यक्रम शास्त्रानुसार आयोजित केला जात नाहीये. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. या व्हिडीओमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणत आहेत की, हे रामानंद पंथाचे मंदिर आहे तर चंपत राय तिथे काय करत आहेत. या लोकांनी तिथून दूर जावे. बाजूला होऊन रामानंद पंथाच्या हाती प्रतिष्ठा द्या.
दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी गुरूवारी सांगितले की, द्वारिकापीठ आणि शृंगेरी शारदा पीठाच्या शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. तर पुरी गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनीही या सोहळ्याला पाठिंबा दिला आहे. मात्र ते आता सोहळ्यास उपस्थित राहणार नसून योग्य वेळी दर्शन घेण्यास येतील.
केवळ उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विरोधात भूमिका मांडली आहे. “बाकी तीनही शंकराचार्य हे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे समर्थन करत आहेत. मात्र त्यांच्या भूमिकेचे चुकीचे आकलन माध्यमांनी केले”, असे आलोक कुमार यांनी सांगितले.
दरम्यान असे असले तरी देखील हिंदू धर्मातील अशा भूतो नभविष्यती सोहळ्यास हिंदु धर्मातील सर्वोच्च अधिकारी मानल्या गेलेल्या ४ मठांच्या शंकराचार्यांची अनुपस्थिती या सोहळ्यात धर्मशास्त्रानुसार नक्कीच काहीतरी कमी असल्याचे सुचवून जाते असा निष्कर्ष काढल्यास गैर ठरणार नाही.
SL/KA/SL
12 Jan. 2024