वर्षभर चालणार काँग्रेसची ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’

 वर्षभर चालणार काँग्रेसची ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाकडून संविधान व संविधान निर्मात्याचा सातत्याने अवमान केला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसने घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना यांचा सन्मान, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षणासाठी ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे देशव्यापी अभियान सुरू केले आहे. या अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून आता 26 जानेवारी 2025 ते 26 जानेवारी 2026 या वर्षभराच्या कालावधीत ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी मोहीम काँग्रेसकडून राबवण्यात येणार आहे. ‘भारत जोडो’ यात्रेप्रमाणे या यात्रेला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाल्याचे सांगत काँग्रेसने अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या मुद्यावरून अमित शहा आणि भाजपाचा निषेध म्हणून देशव्यापी संविधान सन्मान मोहीम राबवण्याचाही निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या वर्षी 26 डिसेंबर रोजी बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान राबवण्यात येणार होते. परंतु माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने हे अभियान स्थगित झाले होते. ते 3 जानेवारीपासून सुरू करण्यात आले असून, 26 जानेवारी रोजी मध्य प्रदेशातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव असलेल्या महू येथे त्याची सांगता होणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान यांचा सन्मान, सामाजिक न्याय व समानतेच्या मुल्यांचे रक्षणासाठी करण्यासाठी काँग्रेस पक्ष कटीबद्ध आहे. याच हेतूने काँग्रेस पक्षाने ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ हे अभियान आयोजित केले आहे. देशपातळीवर 3 जानेवारीपासून हे अभियान सुरू झाले असून 26 जानेवारी रोजी महूच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे सांगता होणार आहे. या निमित्ताने महूमध्ये भव्य रॅलीने होणार आहे.


SL/ML/SL

14 Jan. 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *