काँग्रेसने बदललं भारत न्याय यात्रेचं नाव
नवी दिल्ली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी भारत न्याय यात्रा सुरू करणार असल्याची घोषणा मागील आठवड्यात केली होती. १४ जानेवारीला सुरू होणाऱ्या या यात्रेचं नाव बदलून आता भारत जोडो न्याय यात्रा असं करण्यात आलं आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, राज्य प्रभारी, राज्य युनिट प्रमुख आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत या यात्रेचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ही यात्रा पूर्व-पश्चिम भारता दरम्यान काढण्यात येणार आहे. भारत न्याय यात्रा १४ जानेवारीला मणिपूरपासून सुरू होईल आणि २० मार्चला मुंबईत संपेल. ही यात्रा महाराष्ट्रात ५ दिवस होणार असून नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई अशा 6 जिल्ह्यातून जाणार आहे. राहुल गांधींची ही यात्रा ६६ दिवस यात्रा चालणार आहे. तर देशातील ११० जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास असेल.
काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना, काँग्रेसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मतभेत बाजूला ठेवण्याचा आणि माध्यमांमध्ये अंतर्गत मुद्दे उपस्थित न करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी न्याय यात्रेचं नाव बदलण्याची घोषणाही केली. या यात्रेदरम्यान राहुल गांधी तळागाळातील लोकांशी संवाद साधणार आहेत. त्याच्या समस्या अडचणी समजून घेणार आहेत.प्रत्येक दिवशी दोन सभा होणार आहेत, शक्यतो या सभा कॉर्नर सभा असतील. काही ठिकाणी मोठ्या सभा होणार आहेत. महाराष्ट्रात मालेगाव, नाशिक, भिवंडी, मुंबई या ठिकाणी मोठी सभा होतील. तर BKC मुंबईत यात्रेची सांगता होण्याची शक्यता आहे.
या यात्रेबाबत बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, भाजप सरकार गेल्या १० वर्षातील आपलं अपयश लपवण्यासाठी भावनिक मुद्दे उपस्थित करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नव्या उर्जेने पुढे येऊन काम करावं लागेल. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवावे लागतील. टीकेत गुंतू नका, मीडियामध्ये अंतर्गत मुद्दे उपस्थित न करण्याचं आवाहन केलं. कॉंग्रेस अरुणाचल प्रदेश सोडत असल्याच्या वृत्ताचं यावेळी त्यांनी खंडण केलं. यापूर्वी १४ राज्य होती मात्र आता अरुणाचल प्रदेशचा समावेश करण्यात आला आहे. येत्या ३-४ दिवसात लोगो आणि थीम सॉन्ग लाँच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
SL/KA/SL
4 Jan. 2024