काँग्रेस पक्षाची राज्यात ‘संविधान बचाव’ आणि ‘सद्भावना यात्रा’

 काँग्रेस पक्षाची राज्यात ‘संविधान बचाव’ आणि ‘सद्भावना यात्रा’

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार राज्यात संविधान बचाव यात्रा तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित सद्भावना यात्रा काढण्यात येणार आहेत. २९ एप्रिलला नाशिक येथे सद्भावना यात्रेचे आयोजन केले असून १ मे रोजी सद्भावना सत्याग्रह तर ४ आणि ५ मे रोजी परभणी येथे सद्भावना यात्रा तथा संविधान बचाव यात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

टिळक भवन दादर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, CWC सदस्य नसीम खान, खा. तारिक अन्वर, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव कुणाल चौधरी, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आ. प्रज्ञा सावत, एनएसयुआयचे आमिर शेख, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांच्यासह प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने २०२५ हे वर्ष संघटन वर्ष घोषीत केली आहे, त्याअनुषंगाने संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षाची पदे असणाऱ्यांना पक्षासाठी वेळ द्यावा लागेल. जिल्हाध्यक्षांनी महिन्यातून किमान १० पूर्ण दिवस वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये फिरावे, पक्षाने दिलेल्या आंदोलनात्मक कार्यक्रमांची अंमलबजावणी करावी, महिन्यातून किमान १ बैठक घेतली पाहिजे. तर ब्लॉक अध्यक्षांनी महिन्यातून किमान ८ पूर्ण दिवस प्रभागांमध्ये फिरावे. जिल्हा काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी व्हावे. महिन्यातून किमान १ बैठक घ्यावी, प्रदेश पदाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या जिल्ह्यात महिन्यातून किमान ६ पूर्ण दिवस दौरे करावे, दोन दिवस प्रदेश कार्यालयाने दिलेली जबाबदारी पूर्ण करावी.
महिन्याच्या १० तारखेला प्रदेश कार्यालयाला अहवाल सादर करावा. कोणत्याही संयुक्तीक कारणांशिवाय सलग ३ बैठकांना गैरहजर राहिल्यास त्या पदाधिकाऱ्याला कार्यमुक्त केले जाईल, असे प्रदेशाध्यक्षांनी सांगितले.

बैठकीत राजकीय ठराव मांडण्यात आले त्याची माहिती विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली, ते म्हणाले की, राज्यात हिंदी भाषेची सक्ती करण्यास सर्व स्तरातून विरोध होत असल्याने सरकार बॅकफूटवर गेले आहे. राज्य सरकारने भाषा समितीशी सुद्धा चर्चा केली नाही त्यामुळे या समितीनेही हिंदी भाषा सक्तीला विरोध केला, त्याचे स्वागत करण्यात आले. राज्यात हिंदी भाषेची सक्ती करु नये असा ठराव या बैठकीत करण्यात आला. राज्यात , देशातील सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम सत्ताधारी पक्षाशी संबंधित काही लोक करत आहेत. रामदेव बाबानी ‘सरबत जिहाद’ आणला त्याच्या निषेधाचा ठरावही करण्यात आल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे पण सरकारी भरती करताना मराष्ट्रातील मुलांना डावलले जात आहे. आयकर विभागाच्या भरतीमध्ये महाराष्ट्रातील फक्त ३ मुलांची निवड झाली तर बहुसंख्य इतर राज्यातील आहेत. विशेष म्हणजे मुलाखत घेण्याऱ्यांमध्ये गुजरातमधील अधिकारी होते. भाजपाने महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधला आहे हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेस पक्षाने थोपटे घरात ४० वर्ष आमदारकी दिली, मंत्रीपदे दिली, संग्राम थोपटे यांनाही चारवेळा आमदारकी दिली असे असतानाही पक्षावर आरोप करणे कितपत योग्य आहे असा सवाल करून त्यांच्या कारखान्याचे काही काम असावे त्यासाठी त्यांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला असावा असे वाटते असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

ML/ML/PGB 22 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *