विशाळगडावर बकरी ईदच्या कुर्बानीला सशर्त परवानगी

 विशाळगडावर बकरी ईदच्या कुर्बानीला सशर्त परवानगी

कोल्हापूर, दि. ४ : विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यात बकरी ईद आणि उरुससाठी प्राण्यांची कत्तल करण्यास उच्च न्यायालयाने काल सशर्त परवानगी दिली. न्या. नीला के. गोखले आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या अंतरिम अर्जावर हा निर्णय दिला. त्यानुसार ७ जूनला बकरी ईदसाठी व ८ ते १२ जून या अवधीत उरुससाठी प्राण्यांच्या कत्तलीला मुभा देण्यात आली आहे.

शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड येथे प्राणी आणि पक्ष्यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यासाठी पुरातत्व आणि संग्रहालय संचालक, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जारी केलेल्या विविध पत्रांना ट्रस्टने रिट याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे.

त्या याचिकेत अंतरिम अर्ज करून ट्रस्टने ईद आणि उरूससाठी प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी देण्याची विनंती केली होती. त्या अर्जावर न्यायमूर्ती नीला के गोखले आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली.

सरकारतर्फे ट्रस्टच्या विनंतीला आक्षेप घेण्यात आला. महाराष्ट्र प्राचीन स्मारके, पुरातत्व स्थळे आणि अवशेष नियम, १९६२ नुसार किल्ल्याच्या परिसरात अन्न शिजवण्यास आणि सेवन करण्यास मनाई आहे, असे सरकारी वकिलांनी निदर्शनास आणले. तथापि दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने ट्रस्टचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि काही अटींचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असे स्पष्ट करत विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यात ईद अल-अधा (बकरी ईद) व उरुससाठी प्राण्यांची कत्तल करण्यास परवानगी दिली.

याचिकाकर्त्या ट्रस्टचा युक्तिवाद

विशाळगड किल्ल्यावरील दर्ग्यापासून १.४ किमी अंतरावर खासगी जमिनीवर बंद दाराआड प्रत्यक्ष प्राण्यांचा बळी देण्यात येतो. किल्ल्याच्या परिसरात असलेला दर्गा ११ व्या शतकात बांधलेला एक ऐतिहासिक स्मारक आहे. हिंदू आणि मुस्लिम दोघेही येथे भेट देतात आणि स्मारकाचा आदर करतात. दर्ग्यावरील प्राण्यांचे बलिदान ही एक अविभाज्य प्रथा असली तरी, प्रत्यक्ष बलिदान सार्वजनिक ठिकाणी होत नाही, याकडे याचिकाकर्त्या ट्रस्टतर्फे ज्येष्ठ वकील सतीश तळेकर आणि ॲड. माधवी अय्यप्पन यांनी लक्ष वेधले.

न्यायालयाचे निर्देश

-ट्रस्टने यापूर्वीच्या, १४ जून २०२४ च्या आदेशातील अटींचे काटेकोरपणे पालन करावे

-प्राणी किंवा पक्ष्यांची हत्या ही केवल बंद जागेत खासगी मालकीच्या जागेतच करावी

-कुर्बानीसाठी येणाऱ्या दर्ग्याच्या भाविकांनाही अटी लागू असतील

-प्राण्यांची हत्या खुल्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी करता कामा नये

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *