बहुमत मिळाले आता मुख्यमंत्री पदासाठी उठाबशा

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :पंधराव्या विधानसभेसाठी निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल दोन तृतीयांश बहुमत मिळालेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून आता मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चे बांधणी सुरू झाली असून त्यासाठी तिन्ही पक्ष त्यासाठी उठाबशा काढताना दिसत आहेत, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलेच नेते मुख्यमंत्रीपदी राहावेत म्हणून चक्क देवालाच पाण्यात बुडवून ठेवला आहे. दुसरीकडे आज रात्री उशिरा दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन त्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित होण्याची शक्यता आहे. याकरिता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाचारण केलं जाईल अशी चर्चा आहे.
288 सदस्यांच्या महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाला असून त्यांचे तब्बल 236 आमदार निवडून आले आहेत. इतके मोठे यश मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांकडून दावेदारी सुरू झाली आहे, या निवडणुकीत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली त्यांनी आखलेल्या योजनांचा फायदा महायुतीला झाला त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा संधी मिळायला हवी अशी अपेक्षा शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील अजित पवार यांना एकदा संधी मिळायला हवी अशा अपेक्षेने बॅनरबाजी देखील केली आहे.
शिवसेनेच्या वतीने राज्यातल्या विविध मंदिरांमध्ये अभिषेक आणि आरत्या करत मुख्यमंत्रीपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडावी यासाठी चक्क देवालाच पाण्यात बुडवून ठेवण्यात आल्याचे दिसून आले आहे तर दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी देखील पंढरपूरच्या विठुरायाला साकडे घालत मुख्यमंत्रीपदाला देवेंद्र फडणवीसच लायक असून त्यांनाच संधी मिळावी अशी अपेक्षा बाळगली आहे , भाजपाचे अनेक नेतेही देवेंद्र फडणवीस हेच पुढील मुख्यमंत्री असावेत अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं माध्यमांना सांगत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज रात्री उशिरा अथवा उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची संयुक्त बैठक अपेक्षित असून त्यात नव्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यात येईल अशी अपेक्षा आहे, देवेंद्र फडणवीस हे आज सायंकाळी दिल्लीत रवाना झाले असून आधी ते अमित शहा आणि गरज पडल्यास नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील अशी शक्यता आहे.
तब्बल 133 जागा मिळाल्यानंतर गेली अडीच वर्ष छातीवर दगड ठेवून बसलेला भाजपाचा कार्यकर्ता आता मोठ्या अपेक्षेने आपल्याला संधी मिळेल आणि आपलाच मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा बाळगून आहे. याशिवाय गेल्यावेळी इतर पक्षांना सामावून घेतल्यामुळे मंत्रिपदाची संधी हुकलेल्या अनेक भाजपा आमदारांना आता मंत्रिपदाची आस लागली आहे त्यामुळे तिन्ही पक्षांमध्ये मंत्रिपदाचा फॉर्मुला काय ठरतो हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. विधानसभेनंतर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाला आपला निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यासोबतच त्यांची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवायचे की नाही याबाबतचा निर्णयही घ्यावा लागणार आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसात राज्याचा नवीन मुख्यमंत्री कोण असेल याचे उत्तर जनतेला अपेक्षित आहे.
ML/ML/PGB 25 Nov 2024