अण्णा साहेबांनी माथाडी चळवळ निस्वार्थपणे उभारले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 अण्णा साहेबांनी माथाडी चळवळ निस्वार्थपणे उभारले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवीमुंबई, 25 : घर संसार संस्थान इत्यादी गोष्टी कुर्बान करून अण्णासाहेब या महापुरूषाने माथाडी चळवळ निस्वार्थपणे उभारली व लाखो माथाडी कामगारांचे भविष्य उज्वल केले. आज त्यांचा वारसा निस्वार्थ भावनेने ही चळवळ कार्यरत ठेवली आहे. या चळवळीची पाळेमुळे खोलवर गेली असून या चळवळीला कुणीही थांबवू किंवा अडवू शकत नाही. असे गौरवोद्दगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेबांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त व्यासपीठावरून प्रकट केले. तुर्भे, नवी मुंबई येथील कांदा बटाटा मार्केट मधील लिलावगृहात आयोजित केलेल्या स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त गुरूवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित केलेल्या माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, समाजात भांडणं, दुही निर्माण न करता छत्रपती शिवरायांच्या कार्याच्या दिशेने चालणार आहोत.
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाबाबत बोलताना ते असे म्हणाले की, या समाजाला न्यायालयामार्फत तसेच शासनामार्फत योग्य तो निर्णय घेतले आहेत आणि घेत आहोत. सारथी या संस्थेमार्फत मराठा समाजाचे हजारो अधिकारी निर्माण केले. उच्च शिक्षण घेण्यासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना निवासाची सोय होण्यासाठी शासनामार्फ आर्थिक सहकार्य केले. बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळावर नरेंद्र पाटील यांची नियुक्ती करून जवळपास दीड लाख उद्योजक निर्माण केले आणि ते आज नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे झाले आहे.


संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात उल्लेख केल्याप्रमाणे सिडकोच्या घरांचा प्रश्न, नाशिक, सातारा येथील माथाडी कामगारांचा तसेच पुणे येथील माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत येत्या १५ दिवसात बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेऊ असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवचन दिले. तर नरेंद्र पाटील यांनी त्यांच्या महामंडळाच्या कारकीर्दीत महामंडळाच्या माध्यमातून पाच लाख उद्योजक निर्माण करावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या मेळाव्यात बोलताना संघटनेचे सरचिटणीस व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचे विविध प्रलंबित प्रश्न, बाजार समितीतील मार्केटमध्ये चालणारा किरकोळ व्यापार, वडाळाच्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत देवाभाऊंनी लवकरात लवकर त्यांच्या मागील मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत माथाडी कामगारांना केलेल्या सहकार्यासारखंच आताही सहकार्य करावं अशी विनंती केली. तर अण्णासाहेबांच्या मराठा आरक्षणाच्या बाबतीत बोलताना ते असे म्हणाले की, अण्णासाहेबांनी दुरदृष्टीने मराठा समाजाच्या भव्य मोर्चामध्ये मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती. त्यामागणीनुसार आताच्या काळात जातीपातीच राजकारण कमी करायचं असेल तर, आरक्षणाच्याबाबत न्याय देण्यासाठी एक महामंडळ स्थापन करावं अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी केली. देवाभाऊंनी आत्तापर्यंत झालेल्या दिग्गज मुख्यमंत्र्यांपेक्षाही चांगलं काम केल आहे. शेतकऱ्यांपासून सर्व समाजातील घटकांना योग्य तो न्याय दिला आहे आणि देत राहतील अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
यानंतर बोलताना संघटनेचे कार्याध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगारांच्या विविध समस्यांची पुर्तता होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळीच दखल घ्यावी असे सुचित केले. अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात मराठवाड्यापासून अनेक विभागात शेतकऱ्यांचे व सामान्य जनतेचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्तांना तत्परतेने मदत करावी अशी मागणी त्यांनी केली, तर या मागणीबद्दल ते म्हणाले की, देशावर किंवा राज्यावर संकट आल्यानंतर ते संकट निवारण्यासाठी माथाडी कामगार अग्रभागी असतात व आपले योगदान देतात यावेळीही आम्ही अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना माथाडी कामगारांचा एक दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला असून शासन व विविध संस्थानी यामध्ये सहभाग घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यामध्ये १७ गुणवंत माथाडी कामगारांचा माथाडी भूषण देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
या मेळाव्यास राज्याचे वने मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालक मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, आमदार मंदाताई म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रशांत ठाकुर, महेश बालदी, विक्रांत पाटील, मनोज जामसुतकर, माजी खासदार संजीव नाईक, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख, रूनवाल ग्रुपचे श्री. सुबोध रूनवाल, भाजपाचे नवीमुंबई जिल्हाध्यक्ष श्री. राजेश पाटील, श्री. संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. गुलाबराव जगताप, अध्यक्ष श्री. एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस श्री. आनंद शिवाजीराव पाटील, श्री.चंद्रकांत पाटील, श्री. रविकांत पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड्‌.सौ भारतीताई पाटील, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील, माथाडी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंतराव अण्णासाहेब पाटील, प्राना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. प्राची नरेंद्र पाटील, नवी मुंबईतील नगरसेवक, बाजार समितीचे पदाधिकारी तसेच व्यापारी प्रतिनिधी व माथाडी कामगार मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यामध्ये उपस्थितांचे आभार व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संघटनेचे संयुक्त सरचिटणीस व जनसंपर्क अधिकारी पोपटराव रामचंद्र देशमुख यांनी केले.KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *